Jharkhand Police Recruitment 2024: झारखंडमध्ये उत्पादन शुल्क विभाग शिपाई भरतीसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी ऐनवेळी शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला. शारीरिक सिद्धता दाखविण्यासाठी १.६ किलोमीटर ऐवजी ऐनवेळी एका तासात १० किमी धावण्याची अट घातली गेली. कडक ऊन्हात सकाळपासून रांगेत उभे राहिल्यानंतर जीव तोडून धावत असताना १२ उमेदवारांचा हृदयविकाराच्या झटक्याने आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. २२ ऑगस्ट रोजी ही चाचणी पार पडली होती. जे लोक शारीरिक चाचणी पास होतील, त्यांनाच पुढे लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरविले जाणार होते. मात्र आता १२ जणांच्या मृत्यूनंतर ही भरती प्रक्रिया थांबवून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मृत्यू झालेल्या उमेदवारांचे वय १९ ते ३१ च्या दरम्यान होते. २ सप्टेंबर पर्यंत एकूण १.८७ लाख उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. यापैकी १.१७ लाख उमेदवार पुढच्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. झारखंड राज्याची २००० साली स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस भरती होत आहे. याआधी २००८ आणि २०१९ साली भरती घोषित करण्यात आली होती, मात्र भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.

हे वाचा >> तरुणांसाठी खुशखबर: राज्यात पुन्हा ७ हजार पदांसाठी पोलीस भरती

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आता या भरती प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे भरती प्रक्रिया आता ९ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. चौकशीला अहवाल अद्याप जाहिर झालेला नाही. राज्य सरकारने मात्र नियमानुसारच भरती झाल्याचे सांगितले आहे. मृत उमेदवारांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असून त्याची विविध कारणे असू शकतात, असे पोलिसांनी सांगितले आहे.

झारखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (मुख्यालय) आर. के. मलिक यांनी सांगितले की, काही उमेदवारांचा अचानक मृत्यू झाला. तर काही जण रुग्णालयात नेतानाच मृत्यूमुखी पडले. सर्वांच शवविच्छेदन करण्यात आले आहे. अंतिम अहवाल येण्यात थोडा वेळ जाईल. यापुढे शारीरिक चाचणी देण्याआधी उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा >> Police Recruitment in December: डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती, राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदे

१० किमी धावण्याचा सराव नव्हता

शारीरिक चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केलेली नसल्याचे आणि उच्च आर्द्रतेमध्ये त्यांना धावावे लागल्यामुळेही मृत्यू ओढवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रदीप कुमार नावाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पहिणीने सांगितले की, माझ्या भावाने कधीही १० किमी धावण्याचा सराव केला नव्हता. तसेच सकाळी ६ ते ९ पर्यंत महिलांची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर पुरुष उमेदवारांची चाचणी घेतली गेली, जी दुपारपर्यंत चालू होती. कडक ऊन्हामुळेही उमेदवारांची तब्येत बिघडली असावी, असा एक अंदाज बांधला जात आहे.

झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाच्या सरकारने कोणतीही तयारी न करता भरती प्रक्रिया राबविल्यामुळे मृत्यू ओढवले असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे झारखंड निवडणूक प्रभारी हिंमता बिस्वा सरमा यांनी सांगितले. भाजपाकडून जेएमएम सराकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.