पीटीआय, श्रीनगर
जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रणरेषेपलिकडील तळावर जवळपास १५० दहशतवादी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) वरिष्ठ अधिकाऱ्यानी शुक्रवारी दिली. हिवाळा जवळ येत असल्यामुळे ते घुसखोरीची तयारी करत आहेत. मात्र, सुरक्षा दले त्यांचा अशा प्रकारचा प्रत्येक प्रयत्न उधळून लावतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या हवेतच दोन तास घिरट्या; १४० प्रवासी करत होते प्रवास; अखेर झालं सुरक्षित लँडिंग!

बीएसएफचे महानिरीक्षक (काश्मीर आघाडी) अशोक यादव यांनी शुक्रवारी पत्रकारांना सुरक्षा दलांच्या सज्जतेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, घुसखोरीचे प्रयत्न सुरूच राहतात. विविध गुप्तचर विभागांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही सीमेवर वर्चस्व राखण्याची योजना आखण्यासाठी सैन्याशी समन्वय साधतो. त्यासाठी आम्ही त्यांच्या तळावरील दहशतवाद्यांची संख्या लक्षात ठेवतो. त्यामुळे आम्हाला रणनीतीला आखताना मदत होते. हा आकडा सामान्यत: १३० ते १५०पर्यंत असतो, कधीकधी यापेक्षा जास्तही असतो, अशी माहिती यादव यांनी दिली. नुकत्याच झालेली विधानसभा निवडणूक निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी सुरक्षा दलांनी पोलिसांशी समन्वय राखला होता असेही त्यांनी सांगितले.