‘जगातील काही भाग संघर्ष आणि तणावपूर्ण असताना भारत-आसिआन मैत्री महत्त्वाची आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. एकविसावे शतक आसियान आणि भारताचे असल्याचे विधान त्यांनी केले.

‘भारत-आसियान’च्या २१व्या शिखर परिषदेला त्यांनी संबोधित केले. भारताच्या ‘सक्रिय पूर्व धोरणा’ची (अॅक्ट ईस्ट पॉलिसी) घोषणा दहा वर्षांपूर्वी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या धोरणामुळे संबंधांना नवा आयाम मिळाल्याचे ते म्हणाले. २१ वे शतक हे आशियाचे शतक असल्याचे ते म्हणाले. ‘हे शतक आशिया आणि भारताचे आहे,’ असे ते म्हणाले.

हेही वाचा :काश्मीरमध्ये ओमर मुख्यमंत्री; हरियाणात दसऱ्यानंतर निर्णय

मोदी म्हणाले, ‘आपण शांततेचे पुरस्कर्ते, परस्परांचा आदर आणि एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करणारे आहोत. या भागातील तरुणांचे भवितव्य उज्ज्वल करण्यास आपण कटिबद्ध आहोत. आसियान देशांना केंद्रस्थानी ठेवून भारताने ‘इंडो-पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह’ २०१९ मध्ये सुरू केला. गेल्या वर्षी प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेसाठी सागरी युद्धसराव सुरू केले. गेल्या दशकात आसियानशी भारताचा व्यापार दुप्पट झाला आहे.’ आसियान शिखर परिषद सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे मोदी यांनी एक्सवरील टिप्पणीत म्हटले आहे. भारत आणि आसियान देशांमध्ये सर्वसमावेशक सामरिक भागीदारी वाढविण्यासंबंधी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी आसियान आणि पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी या ठिकाणी आले आहेत. आसियान सदस्य राष्ट्रांमध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, भारत, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई यांचा समावेश आहे. तर, पूर्व आशिया देशांमध्ये ‘आसियान’च्या दहा देशांसह ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, रशिया आणि अमेरिका या आठ भागीदार देशांचा समावेश आहे.

हेही वाचा :काँग्रेस नेत्यांच्या वर्तनावर राहुल गांधी यांची नाराजी

कलाकारांकडून ‘लाओ रामायण’ सादर

लाओसमधील कलाकारांनी सादर केलेला रामायणातील एका कथेचा भाग पाहिला. भारत आणि लाओसमधील दीर्घ काळाचे सांस्कृतिक संबंध यातून दिसले, अशी टिप्पणी मोदी यांनी केली. भारतीयांच्या मांडणीपेक्षा लाओ रामायण हे काहीसे वेगळे आहे.