नवी दिल्ली : छत्तीसगडच्या बस्तरमधील सर्वाधिक नक्षलप्रभावित क्षेत्रात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) चार हजारहून अधिक जवानांच्या चार तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा संकल्प सरकारने केला आहे. त्याच निर्णायक लढ्यातील रणनीतीचा एक भाग म्हणून ही पावले उचलली जात आहेत.

रायपूरपासून ४०० ते ५०० किलोमीटर अंतरावरील बस्तर भागात ‘सीआरपीएफ’ने झारखंडमधून तीन आणि बिहारमधून आपली एक तुकडी माघारी बोलावली आहे. या दोन राज्यांमधील नक्षली कारवायांची स्थिती सुधारली असून, येथील घटना नगण्य असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे येथील तुकड्यांचा छत्तीसगडमध्ये चांगल्या पद्धतीने उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा >>> ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात, मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला; मणिपूरमध्ये वाढीव सुरक्षा

छत्तीसगडमधील नक्षली भागांतील ‘सीआरपीएफ’च्या सध्याच्या मनुष्यबळाबरोबर १५९, २१८, २१४ आणि २२ आदी तुकड्या तैनात केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक तुकडीमध्ये १ हजार कर्मचारी कार्यरत असतात. या तुकड्या दंतेवाडा आणि सुकमा या दूरवरच्या जिल्ह्यांमध्ये तसेच ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमेवरील दुर्गम भागांत तैनात केल्या जाणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या महिन्यात छत्तीसगडची राजधानी रायपूर भेटीत मोहिमेची कालमर्यादा जाहीर केली होती. यावेळी त्यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वांत मोठा धोका असलेल्या डाव्या विचारसरणीच्या अतिरेकापासून देशाला मुक्त करण्यासाठीच्या कृती योजनेवर भर दिला होता.

चकमकीत १५३ नक्षलवादी ठार

छत्तीसगड राज्यात नक्षलविरोधी कारवायांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १५३ नक्षलवादी मारले गेले आहेत. २००४ ते २०१४ च्या तुलनेत २०१४ ते २०२४ मध्ये देशातील नक्षली हिंसाचाराच्या घटनांत ५३ टक्के घट झाल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी २४ ऑगस्ट रोजी रायपूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यादृष्टीने ही मोहीम निर्णायक असल्याचे म्हटले जाते आहे.