Rape and Murder Case in West Bengal : पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील एका गावात एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी शनिवारी सकाळी जिल्ह्यात संताप व्यक्त केला. संतप्त नागरिकांनी पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप करत पोलीस चौकी पेटवली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कोचिंग क्लासला गेली अन् घरी परतलीच नाही

मुलीचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती शुक्रवारी दुपारी कोचिंग सेंटरमध्ये गेली होती. ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. तिला शोधण्यात अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे ती हरवल्याची तक्रार नोंदवली. स्थानिक पोलिसांनी मात्र त्यांना दुसऱ्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले.”

हेही वाचा >> UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या

शुक्रवारी रात्री नजीकच्या तलावात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. शनिवारी सकाळी स्थानिक पोलीस ठाण्याभोवती झाडू, लाठ्या, बांबू घेऊन संतप्त जमाव जमा झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी आतिश बिस्वास यांना घेराव घालण्यात आला. ग्रामस्थांनी पोलीस चौकीची तोडफोड करून ती पेटवून दिली, त्यामुळे अनेक महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अखेर लाठीचार्ज केला. “आतापर्यंत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का हे पाहणे बाकी आहे. परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते आमचे प्राधान्य आहे”, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांवर निष्काळजीपणा आणि अकार्यक्षम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांना उत्तर देताना पोलीस म्हणाले, “आम्ही आरोपीला ओळखले आहे आणि त्याला अटक केली आहे. त्याने कबूलही केले आहे. गुन्ह्याची माहिती मिळताच आम्ही तत्परतेने कार्यवाही केली. तरीही लोकांचे आरोप असतील तर आम्ही त्याकडेही नक्कीच लक्ष घालू.”

विरोधकांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका

या घटनेने विरोधकांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर टीकास्त्र सोडल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. “त्यांनी तक्रार गांभीर्याने घेतली नाही. घरातील दुर्गा सुरक्षित नसेल तर कोणत्या दुर्गेची पूजा करावी? हे सर्व ममता बॅनर्जींमुळेच होत आहे. त्यांनी एक संदेश पसरवला आहे की पोलिसांनी सहजपणे एफआयआर घेऊ नये”, असे भाजप नेते सुकांतो मजुमदार म्हणाले. “ज्यांनी नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला… त्यांना अष्टमीला दुर्गापूजा करण्याचा अधिकार आहे का? समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत?” असं सीपीआयएमचे नेते तन्मय भट्टाचार्य म्हणाले.