पीटीआय, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच जाहीर सभेत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. जंतर-मंतरवर रविवारी झालेल्या ‘जनता की अदालत’ नावाच्या या सभेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना मोदींच्या कृतीबाबत पाच प्रश्न विचारले. यामुळे आगामी काळात आम आदमी पक्षाने भाजपची कोंडी करण्यासाठी नवी रणनीती आखल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘मुलगा आता एवढा मोठा झाला का, की तो आईला तोरा दाखवत आहे,’ अशी सुरुवात करून केजरीवाल यांनी आपल्या भाषणाचा रोख स्पष्ट केला. त्यानंतर कथित पक्ष फोडाफोडी, लोकसभा निवडणुकीपूर्वी नड्डा यांनी केलेले विधान आदी विषयांवर केजरीवाल यांनी थेट सरसंघचालकांना प्रश्न केले. ‘‘वयाच्या पंचाहत्तरीनंतर नेत्यांनी निवृत्त व्हावे, असा नियम संघ आणि भाजपने केला आहे. याच नियमांतर्गत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कलराज मिश्र आदींना निवृत्त केले गेले. आता अमित शहा म्हणतात, की हा नियम मोदी यांना लागू होत नाही. हे डॉ. भागवत यांना मान्य आहे का,’’ असा खोचक प्रश्न केजरीवाल यांनी केला.

हेही वाचा >>>अनुरा दिसानायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष

अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे गाजलेल्या जंतर-मंतरचे वातावरण रविवारी ‘आप’च्या निळ्या-पिवळ्या रंगांनी भरून गेले होते. केजरीवाल व्यासपीठावर येताच कार्यकर्त्यांनी ‘ना रुकेगा ना झुकेगा’ अशा घोषणा दिल्या. ‘आमचे केजरीवाल इमानदार आहेत’ अशा आशयाचे फलक सभेमध्ये झळकविण्यात आले होते. आपण खुर्चीसाठी नव्हे, तर जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहोत, असे सांगत आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दु:खी होऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे केजरीवाल म्हणाले. ‘मी चोर आहे की मला तुरुंगात पाठविणारे चोर आहेत,’ असा सवालही केजरीवाल यांनी केला. पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीच्या काळात मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान सोडून सर्वसामान्य जनतेबरोबर राहायला जाण्याचे आश्वासनही त्यांनी या सभेत दिले.

भाजपचीही निदर्शने

जंतर-मंतरपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅनॉट प्लेस येथे भाजपने केजरीवाल आणि ‘आप’विरोधात निदर्शने केली. ‘आप’चे दिल्ली सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप यावेळी भाजप नेत्यांनी केला. ‘राजघाट’ येथेही याच मुद्द्यांवर भाजपने आंदोलन केले.

हेही वाचा >>>चीनकडून ‘आपली’ परीक्षा! ‘क्वाड’ बैठकीत बायडेन यांची टिप्पणी; ‘हॉट माइक’मुळे जगजाहीर

काय आहेत प्रश्न?

 यंत्रणांचा वापर करून अन्य पक्ष फोडणे, सरकारे उलथविण्याची कृती संघाला मान्य आहे का?

अडवाणी यांच्याप्रमाणे निवृत्तीच्या वयाचा भाजपचा नियम मोदी यांनाही लागू आहे का?

राजकारण्यांना ‘भ्रष्ट’ म्हणून नंतर पक्षाबरोबर घेण्याचे भाजपचे धोरण मान्य आहे का?

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ‘पक्षाला आता संघाची गरज नाही’ या विधानाशी डॉ. भागवत सहमत आहेत का?

भाजप सध्या करीत असलेल्या राजकारणावर सरसंघचालक समाधानी आहेत का?

आगामी (दिल्ली) विधानसभा निवडणूक ही माझ्यासाठी अग्निपरीक्षा असेल. मी अप्रमाणिक आहे, असे वाटत असेल तर मला मत देऊ नका. – अरविंद केजरीवालनेते, आप