आमीरला भारतातून निघून जायचे असेल तर त्याला अडवण्यासाठी कोणीही येणार नाही, उलट त्यामुळे भारताची लोकसंख्या कमी होण्यास मदत होईल, अशा शब्दांत भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांनी आमीर खानवर टीका केली. आमिरसारख्या ज्या लोकांना भारतात असहिष्णुता असल्याचे वाटते त्यांनी जगातील कोणता भाग सहिष्णू आहे हे सांगावे. याशिवाय, ‘इसिस’सारख्या संघटनेने आत्तापर्यंत जे काही केले आहे त्याला सहिष्णुता म्हणता येईल का? असा सवालही योगी आदित्यनाथ यांनी विचारला. जर कुणाला भारत सोडायचा आहे तर त्यांना कुणी अडवले आहे? तसे करायचे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे. निदान त्यामुळे देशाची लोकसंख्या कमी होईल, असे योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. आमिर खानसारख्या लोकांकडून एकापाठोपाठ एक असहिष्णुतेविषयी उठविण्यात येणारे प्रश्न राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा आरोपही यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केला.