मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मागील काही दिवसांपासून जाणीवपूर्वक कमी कॅलरीचा आहार घेत असल्याचा आरोप दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी केला आहे. त्यांच्या आरोपानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, नायब राज्यपालांच्या या आरोपाला आता आम आदमी पक्षानेही प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही काय बोलताय, ते तुम्हाला तरी कळतंय का? असा प्रश्न आपने नायब राज्यपालांना विचारला आहे.

आम आदमी पक्षाचे नायब राज्यपालांना प्रत्युत्तर

नायब राज्यपालांच्या आरोपानंतर आम आदमी पक्षाने एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात भाष्य केलं आहे. नायब राज्यपाल साहेब, तुम्ही काय बोलत आहात, हे तुम्हाला तरी कळतंय का? अशाप्रकारे कोणी व्यक्ती स्वत:च्याच जीवाशी कसा खेळेल? खरं तर अरविंद केजरीवाल यांच्या जीवाशी खेळण्याचे तुमचे आणि भाजपाचे षडयंत्र पुढे आले आहे. त्यामुळे तुम्ही हे पत्र लिहिले आहे. हे पत्र खोटे आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने दिली आहे.

हेही वाचा – “केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?

आप नेते संजय सिंह यांनीही नायब राज्यपालांना केलं लक्ष्य

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही या आरोपांवरून नायब राज्यपाल यांना लक्ष्य केलं आहे. ही काय मस्करी सुरू आहे? कोणी व्यक्ती स्वत:हून स्वत:ची शूगर लेव्हर कशी कमी करेन? जर तुम्हाला एखाद्या आजाराबाबत माहिती नाही, तर तुम्ही अशाप्रकारे पत्र लिहू नये, देव न करो, तुमच्यावर अशी वेळ येवो, असं प्रत्युत्तर त्यांनी दिले.

नायब राज्यपालांनी नेमके काय आरोप केले?

दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक कमी कॅलरीचा आहार घेत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचे वजन घटत असल्याचेदेखील त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. याशिवाय अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत केजरीवाल यांनी योग्य तो आहार घ्यावा, अशी विनंती देखील त्यांनी यापत्रात केली आहे. मी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विनंती करतो, की त्यांनी योग्य तो आहार घ्यावा. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.