Accident in UP Mirzapur : उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दहा जण ठार तर तीनजण जखमी आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मिर्झापूर-वाराणसी सीमेवरील कछावन आणि मिर्झामुराद भागांदरम्यान जीटी रोडवर मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलिस अधीक्षक (मिर्झापूर) अभिनंदन यांनी सांगितले.

“भदोही जिल्ह्यात बांधकामाच्या कामावरून परतत असलेल्या १३ मजुरांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या ट्रकने मागून धडक दिली”, असे एसपी म्हणाले. अपघाताची माहिती मिळताच एसपी आणि इतर वरिष्ठ अधिकारी बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा >> 1968 Plane Crash : शहीद जवानाचा मृतदेह ५६ वर्षांनी मूळ गावी, आई-वडील, पत्नी व मुलांपैकी कोणीच उरलं नाही; गावावर शोककळा

१० जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

“१३ जखमींपैकी १० जणांचा मृत्यू झाला तर इतर तिघांना IIT-BHU येथे रुग्णालयात नेण्यात आले, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

मोदींनीही व्यक्त केला शोक

“उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झालेला रस्ता अपघात अत्यंत वेदनादायी आहे. यामध्ये ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. यासोबतच मी सर्व जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो”, असं मोदी एक्स पोस्टवर म्हणाले.

“राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन पीडितांना शक्य तितक्या मदत करत आहे,” असंही मोदी म्हणाले. पोलिसांनी मृतदेह शवागारात पाठवले आहेत. या प्रकरणी कच्छवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. अपघाताला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचा पोलीस सखोल तपास करत आहेत.