उत्तरप्रदेशातील दादरी हत्याकांडाचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापण्यास सुरूवात झाली आहे. मोहम्मद अखलाखच्या कुटुंबाविरुद्ध २० दिवसांत कारवाई करा नाहीतर जनप्रक्षोभ आवरता येणार नाही, अशा इशाराच बिसरातील गावकऱ्यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद अखलाखच्या घरात गोमांसच असल्याचा अहवाल मथुरा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने सादर केला होता. त्यामुळे आता बिसरातील गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी अखलाखच्या कुटुंबियांविरुद्ध गोहत्या आणि गोमांस सेवनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उचलून धरली आहे. गाय हा आमच्या धार्मिक मान्यतेचा प्रश्न आहे. आम्ही शांतताप्रिय आहोत आणि आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वासही आहे. त्यामुळे येत्या २० दिवसांत सरकारने सर्व पर्यायांची चाचपणी करून आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात. अन्यथा माझ्या गावातील जनक्षोभ आवरता येणे शक्य होणार नाही, असे भाजपचे स्थानिक नेते आणि याप्रकरणातील आरोपीचे वडिल संजय राणा यांनी सांगितले. याप्रकरणात प्रशासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देणार नसेल तर आम्हालाच काहीतरी पाऊल उचलणे भाग पडेल, असे बागसिंग या गावकऱ्याने सांगितले.
‘आमचे गाव सोडून जाणार नाही’
उत्तर प्रदेशच्या दादरी येथील बिसरा गावात मोहम्मद अखलाख यांच्या घरात गोमांस साठवून ठेवले आहे आणि शिजवले जात आहे असे २८ सप्टेंबरला स्थानिक मंदिरातील ध्वनिक्षेपकावरून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर १०० ते २०० गावकऱ्यांचा जमाव त्याच्या घराजवळ गोळा झाला. संतप्त जमावाने अखलाखला घरातून बाहेर खेचून दगड-विटांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा दानिश याच्या कवटीला गंभीर इजा पोहोचली होती. या प्रकरणावरून देशात असहिष्णुतेसंदर्भात मोठे वादंग माजले होते. पोलिसांनी या प्रकरणी भाजपच्या स्थानिक नेत्याच्या मुलासह दहा जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती.
गोवंशप्रतिपालकांचा विजय