राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यांच्या घटनापीठांकडे सुपूर्द करण्यासंदर्भात आज ( १५ फेब्रुवारी ) सुनावणी पार पडली. उद्या ( १६ फेब्रुवारी ) पुन्हा नियमीतपणे सुनावणी पार पडणार आहे. नबाम रेबिया प्रकरणावरून काल ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि आज ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, आजच्या सुनावणीत महाधिवक्ता तुषार मेहता आणि कपिल सिब्बल यांच्यात वाद झाला.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा या पाच सदस्यांसमोर तुषार मेहता राज्यापालांच्या वतीने युक्तीवाद करत होता. तुषार मेहता यांनी सांगितलं की, “आपल्याकडे दोन पक्षीय व्यवस्था नाही. कारण, भारत हा बहुपक्षीय लोकशाही असलेला देश आहे.”
“बहुपक्षीय लोकशाहीचा अर्थ आपण युतीच्या युगामध्ये आहोत. युतीचे दोन प्रकार असतात, एक मतदानापूर्वी, दुसरी मतदानानंतर. मतदानानंतरची युती ही संधीसाधू समजली जाते. पण, मतदानापूर्वीची युती ही तत्वानुसार झालेली असते. तसेच, मतदार हा व्यक्तीला नाहीतर, पक्षाच्या विचारसारणीला मतदान करतो,” असं तुषार मेहता यांनी म्हटलं.
यावर कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेत म्हणाले की, “ते राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद का करत आहेत. मी स्वतंत्रपणे युक्तिवाद करत असल्याचं ते सांगत आहे. मग, सत्तेत असलेल्या पक्षातील लोकांना खरेदी करण्याचा अधिकार आहे का? यावरही त्यांनी युक्तिवाद करणं गरजेचं आहे,” असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं.
हेही वाचा : “…म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना माघारी बोलवलं”, मनसे नेत्याचं विधान
“…त्यानंतरही झिरवाळ काम करत राहिले”
दरम्यान, शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे यांनी युक्तीवाद करताना सांगितलं की, “पक्षांतर बंदी कायदा करुनही पक्षांतर थांबलं नाही. तसेच, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर शिंदे गटाच्या आमदारांनी ईमेलद्वारे अविश्वास ठराव आणलेला असतानाही तो पटलावर आलाच नाही. त्यानंतरही झिरवाळ काम करत राहिले. झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव असतानाही अपत्रातेची बजावलेली नोटीस नियमाला धरुन नव्हती.”