अफगाणिस्तानामध्ये तालिबानी बंडखोरांची मुसंडी सुरूच असून शुक्रवारी त्यांनी दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार महत्वाची शहरे ताब्यात घेतली. तालिबानी सैन्य राजधानी काबूलकडे कूच करीत असून त्यांच्यात आणि सरकारी लष्करी दलांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. आतापर्यंत हेरात या दुसऱ्या क्रमांकाच्या आणि कंदाहार या तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरांसह ३४ प्रांतांपैकी १७ प्रांतांच्या राजधान्या बंडखोरांच्या ताब्यात गेल्या आहेत. आता अफगाणिस्तानच्या दोन -तृतीयांश भागावर त्यांचे नियंत्रण आहे. असं असतानाच तालिबानने भारतासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. भारत हा मित्र आहे की शत्रू यासंदर्भात तालिबानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलीय.
नक्की वाचा >> …म्हणून दानिश सिद्दीकीची हत्या झाली; तालिबानने दिलं स्पष्टीकरण
तालिबानचे कतारमधील दोहा येथील कार्यालयातील प्रवक्ता मोहम्मद सोहिल साहीनने एनडीटीव्हीशी संवाद साधला. त्यावेळी भारताला तुम्ही मित्र मानता की शत्रू?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना प्रवक्ते मोहम्मद सोहिल साहीनने हे तुम्ही तुमच्या सरकारलाच विचारलं पाहिजे असं म्हटलं आहे. “तुम्ही हे तुमच्या सरकारला विचारलं पाहिजे की ते तालिबानला मित्र मानतात की शत्रू. जर भारत अफगाणिस्तानमधील जनतेला आमच्याविरोधात लढण्यासाठी बंदूका, शस्त्र आणि स्फोटके पुरवत असेल तर आम्ही याकडे वैर भावनेतून केलेली कारवाई अशा दृष्टीकोनातूनच पाहू. मात्र भारताने अफगाणिस्तानमधील शांतता आणि भरभराटीसाठी काम केलं त्याला आम्ही वैर भावना म्हणणार नाही. काय ते भारताने ठरवावं,” असं प्रवक्त्याने सांगितलं.
भारताची तालिबानशी चर्चा सुरु आहे का या प्रश्नावरही साहीनने उत्तर दिलं. “होय, आम्ही पण बातम्या ऐकल्या की भारतीय अधिकारी दोहा आणि इतर ठिकाणी तालिबानशी चर्चा करत आहेत. मात्र याची खात्रीशीर माहिती माझ्याकडे नाही. मात्र मी ठामपणे हे सांगू शकतो की काल झालेल्या एका बैठीला भारतीय अधिकारी आणि तालिबानी प्रतिनिधी उपस्थित होते,” असं प्रवक्ता म्हणाला.
नक्की वाचा >> “दानिश सिद्दकीचा मृत्यू साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होवो यासाठी देवाकडे प्रार्थना करतो”; अभिनेत्याचं ट्विट
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यास आमच्या देशामधून आम्ही आयएसआयएस आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांना काम करण्यास परवानगी देऊ, असंही तालिबानने स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याचा दावा प्रवक्त्याने फेटाळून लावला. “तुम्ही म्हणता आम्हाला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. मात्र माझ्यामते तुम्ही असं म्हणत आहात कारण तुमचे पाकिस्तानशी वैर आहे. तुम्ही हा दावा अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहून केलेला नाहीय,” असं प्रवक्त्यांनी सांगितलं.
१९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवणाऱ्या तालिबानला अमेरिकेने जवळजवळ संपवलं होतं. इस्लामिक शिरिया कायद्यानुसार तालिबान कारभार करतं. यामध्ये महिलांना कामाची तसेच शिक्षणाची परवानगी नसते. पुरुष नातेवाईक सोबत असेपर्यंत महिला एकटी घराबाहेर पडू शकत नाही. पुरुषांनी दाढी वाढवून डोक्यावर गोलाकार टोपी घालणं बंधनकारक असतं. मनोरंजनाची साधने वापरण्यावर बंदी असते. याचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा केली जाते. अमेरिकेने दणका दिल्यानंतर तालिबान्यांनी पाकिस्तानचा आश्रय घेतल्याचं सांगण्यात येतं.