दिल्लीचे भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. ते आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत. यानंतर आता भाजपाचे खासदार जयंत सिन्हा यांनीदेखील आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचे ठरवले आहे. मला थेट निवडणूक लढवायची नसून मला परवानगी द्यावी, अशी विनंती सिन्हा यांनी भाजपाच्या नेतृत्वाला केलीय.

जयंत सिन्हा यांनी काय निर्णय घेतला?

सिन्हा यांनी नुकतेच एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती दिलीय. सिन्हा हे झराखंडमधील हजारीबाग येथील खासदार आहेत. “भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलाविरोधात लढण्यावर मला माझे लक्ष केंद्रित करायचे आहे,” असे सिन्हा यांनी सांगितले आहे. तसेच प्रत्यक्ष निवडणूक लढवणार नसले तरी ते आर्थिक तसेच प्रशासकीय पातळीव पक्षात काम करणार आहेत. हा निर्णय घेताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

मोदी, अमित शाहांचे मानले आभार

“भारतातील लोकांची तसेच हजारीबाग येथीलल सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाच्या नेतृत्वाने मला वेगवेगळे काम करण्याची संधी दिली. मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!” अशा भावना जयंत सिन्हा यांनी आपल्या एक्स खात्यावर व्यक्त केल्या.

गौतम गंभीरने घेतला संन्यास

दरम्यान, याआधी माजी क्रिकेटपटू तथा दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनीदेखील आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. मला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतोय, असं गौतम गंभीर यांनी सांगितलंय.

भाजपा नव्या चेहऱ्यांना संधी देणार

दरम्यान, भाजपा या लोकसभा निवडणुकीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. तशी चाचपणी भाजपाच्या नेतृत्वाकडून केली जात आहे. हे करत असताना अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाऊ शकते. भाजपा लवकरच आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. या यादीत एकूण १६० उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा नेमकं कोणाला नव्याने संधी देणार? आणि कोणाचे तिकीट कापणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader