दोषी ठरवण्यात आलेले राजद खासदार लालूप्रसाद यादव व जगदीश शर्मा यांना न्यायालयाच्या निर्णयानंतर आता अपात्र ठरवण्याबाबतचा प्रश्न जवळपास निकालात निघाला असून महाधिवक्ता जी.ई.वहानवटी यांनी लोकसभा सचिवालयास त्यांच्या जागा रिकाम्या (रिक्त) करण्याची अधिसूचना करण्यास सांगितले आहे.
न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याबाबत दोन आठवडय़ात दुसऱ्यांदा मत व्यक्त करताना वहानवटी यांनी सांगितले की, ‘‘दोषी ठरलेल्या व शिक्षा झालेले लोकप्रतिनिधी हे अपात्र ठरले आहेत. ज्या दिवशी त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले त्यादिवसापासून ते अपात्र ठरले आहेत, आता लवकरच त्यांच्या जागा रिकाम्या करणारी अधिसूचना लोकसभा सचिवालय जारी करील. अशा प्रकारची अधिसूचना जारी करण्यात कालहरण करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अनुपालन टाळण्यासारखे होईल.’’
लोकसभा सचिवालयाने देशाचे वरिष्ठ कायदा अधिकारी असलेल्या वहानवटी यांच्याकडे याबाबत नेमकी प्रक्रिया काय आहे अशी विचारणा केली आहे. राज्यसभा सचिवालयाने खासदार रशीद मासूद यांना एमबीबीएस घोटाळा प्रकरणी चार वर्षे कारावासाची शिक्षा झाल्याने त्यांची जागा रिकामी झाल्याचे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.