केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी समान नागरिक कायद्यासंदर्भात बोलताना चार पत्नी असणं हे अनैसर्गिक असल्याचं म्हटलं आहे. ‘आज तक’च्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी समान नागरिक कायदा हा एखाद्या धर्माविरोधात नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी आहे असं सांगितलं. दरम्यान नितीन गडकरींच्या विधानावर एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर दिलं आहे.
गडकरी नेमकं काय म्हणाले?
“तुम्हाला असा एखादा मुस्लीम देश ठाऊक आहे का जिथे दोन नागरी कायदे आहेत? एखाद्या पुरुषाने महिलेशी लग्न केलं तर ते नैसर्गिक आहे. मात्र एका पुरुषाने चौघींशी लग्न करणं हे अनैसर्गिक आहे. मुस्लीम समाजातील पुढारलेले आणि सुशिक्षित लोक चार लग्न करत नाहीत. सामान नागरिक कायदा हा एखाद्या धर्माविरोधात नाही. हा कायदा देशाच्या प्रगतीसाठी आहे,” असं गडकरी म्हणाले.
समान नागरिक कायद्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये असंही गडकरींनी म्हटलं आहे. देशातील गरीबांना या कायद्याचा फायदा होईल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. केंद्र सरकार समान नागरिक कायदा देशभरामध्ये लागू करण्यासाठी कायदा का आणत नाही असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी हे विधान केलं. तसेच सध्या हा विषय चर्चेत असून राज्य सरकारांनी साथ दिली तर या कायद्याचा देशाभरातील लोकांना फायदा होऊ शकतो असं गडकरी म्हणाले.
ओवेसींचं उत्तर
“महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्यासाठी मी नितीन गडकरींना आव्हान देतो. तुमची ती संस्कृती आणि आमची संस्कृती नाही?”, अशी विचारणा त्यांनी केली. “मुस्लीम पत्नी या वैध पत्नी आहेत. त्यांना देखभाल खर्च आणि संपत्तीत वाटाही मिळतो,” असं ओवेसी म्हणाले आहेत. ओवेसींनी यावेळी भाजपाला लक्ष्य करत, समान नागरी कायद्यावर बोलतात, मात्र लव्ह जिहादवरुन हल्ला करतात अशी टीका केली.
मुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
समान नागरी कायदा काय आहे?
समान नागरी कायदा हा भारतीय संवाधिनानुसार कायद्याच्या ४४ व्या कलमाअंतर्गत योतो. यामध्ये खासगी आयुष्याशी संबंधित कायद्यांचा समावेश आहे जे सर्व भारतीयांना सामानप्रकारे लागू असतील. यामध्ये जात, धर्म, लिंग यासारखा भेदभाव केला जाणार नाही. लग्न, घटस्फोट, दत्तक घेणे यासारख्या गोष्टींचा या कायद्यांमध्ये समावेश होतो.