एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गुजरात निकालावर भाष्य केलं असून, भाजपाला मिळणाऱ्या हिंदू मतांचा वाटा मोठा असल्यानेच त्यांचा विजय होत असल्याचं सांगितलं आहे. ‘आज तक’च्या कार्यक्रमात बोलताना ओवेसींनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला लक्ष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण आहे यासाठी हा राजकीय लढा सुरु असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
“भाजपाला जास्तीत जास्त हिंदू मतं मिळत असल्याने त्यांचा विजय होत आहे. पण तेलंगण, हैदराबाद किंवा केरळसारख्या राज्यांमध्ये ते कधीही प्रवेश करु शकणार नाहीत,” असं आव्हानच ओवेसी यांनी दिलं आहे.
हिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय? सांगत आहेत गिरीश कुबेर
“भाजपाची मुस्लीम समाजाशी कोणतीही जवळीक किंवा नातं नाही. दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षदेखील तेच करत आहे,” असा दावा ओवेसींनी केला. “आता संपूर्ण राजकीय लढा नरेंद्र मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण यासाठी सुरु आहे. मग राष्ट्रवादाचं काय होणार?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
समान नागरी कायद्यावरुन गडकरींना आव्हान
ओवेसी यांनी यावेळी समान नागरी कायद्यावर भाष्य करताना भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष्य केलं. नितीन गडकरी यांनी समान नागरी कायद्यासंबंधी बोलताना चार पत्नी असणं अनैसर्गिक असल्याचं म्हटलं आहे.
विश्लेषण: गुजरातमध्ये भाजपच्या विक्रमी विजयाचे रहस्य काय? ‘गुजरात मॉडेल’ आता लोकसभा निवडणुकीतही?
“महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्यासाठी मी नितीन गडकरींना आव्हान देतो. तुमची ती संस्कृती आणि आमची संस्कृती नाही?”, अशी विचारणा त्यांनी केली. “मुस्लीम पत्नी या वैध पत्नी आहेत. त्यांना देखभाल खर्च आणि संपत्तीत वाटाही मिळतो,” असं ओवेसी म्हणाले आहेत. ओवेसींनी यावेळी भाजपाला लक्ष्य करत, समान नागरी कायद्यावर बोलतात, मात्र लव्ह जिहादवरुन हल्ला करतात अशी टीका केली.