Amantullah Khan आप म्हणजेच आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांना ईडीने अटक केली. आज सकाली ईडीने त्यांच्या घरावर छापा मारला. ज्यानंतर काही तास त्यांच्या घरी तपास सुरु होता. आता काही वेळापूर्वीच अमानतुल्लाह खान ( Amantullah Khan ) यांना ईडीने अटक केली. दिल्लीतल्या कथित वक्फ घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

आज सकाळी नेमकं काय घडलं?

अमानतुल्लाह खान ( Amantullah Khan ) हे आम आदमी पार्टीचे आमदार आहेत. दिल्लीतल्या ओखला या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व ते करतात. दिल्ली वक्फ बोर्डाच्या संचालक पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात जो आर्थिक गैरव्यवहार झाला त्याचा तपास ईडीकडून केला जातो आहे. सोमवारी सकाळी ईडीचं पथक अमानतुल्लाह यांच्या घरी पोहचलं. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी आमदार अमानतुल्लाह आणि ईडीचे अधिकारी यांच्यात बाचाबाचीही झाली. काही तास या ठिकाणी झडती घेतल्यानंतर ईडीने अमानतुल्लाह यांना अटक केली.

हे पण वाचा- Manish Sisodia : “…तर २४ तासांच्या आत केजरीवाल तुरुंगाबाहेर येतील”, मनीष सिसोदियांचा दावा, विरोधी पक्षांना आवाहन करत म्हणाले…

दिल्ली वक्फ बोर्डाचा घोटाळा काय आहे?

दिल्ली सरकारच्या महसूल विभागाच्या मुख्यालयाने २०१६ मध्ये वक्फ बोर्डाचे माजी तत्कालीन अध्यक्ष अमानतुल्लाह खान ( Amantullah Khan ) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत हा आरोप लावण्यात आला होता. या तक्रारीत हा आरोप करण्यात आला होता की अमानतुल्लाह खान यांनी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदाचा गैरवाप करुन मनमानी पद्धतीने नियुक्त्या केल्या. अमानतुल्लाह खान ( Amantullah Khan ) यांनी ३२ लोकांची नियुक्ती बेकायदेशीर पद्धतीने केली असा त्यांच्यावरचा आरोप आहे. हे प्रकरण सीबीआयकडेही होतं. सीबीआयला जेव्हा हे समजलं की अमानतुल्लाह खान यांनी महबूब आलम यांना हाताशी धरुन त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला आहे तेव्हा सीबीआयनेही गुन्हा दाखल केला. जाणीवपूर्वक नियमांची पायमल्ली करण्यात आली. यामुळे सरकारी खजिन्याचं नुकसान झालं असंही सीबीआयने म्हटलं आहे. सीबीआयने हे देखील सांगितलं की खान यांनी केलेली भरती प्रक्रिया पारदर्शी नव्हती. जर ती पारदर्शी असती तर योग्य आणि पदासाठी लायक असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळाली असती. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीनेही गुन्हा दाखल केला. आता ईडीने आज अमानतुल्लाह खान यांना अटक केली.

लाल डायरीने वाढवल्या अडचणी

सप्टेंबर २०२२ मध्ये या वक्फ बोर्ड घोटाळा प्रकरणात जो तपास करण्यात आला त्यात एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एक लाल डायरी आढळून आली. ही लाल डायरी या तपासातला महत्वाचा पुरावा ठरली. या लाल डायरीत अमानतुल्लाह यांच्याबाबतची गुपितं आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची एंट्री लिहिली आहे. हवालाच्या मार्गे हे पैसे दुबईला पाठवले गेल्याचा संशय एसीबीला आहे.