दिल्लीतील १ जानेवारीला सुलतानपूरी परिसरात दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर कारचालाने दुचाकीस्वार असलेल्या २० वर्षीय अंजली सिंगला १२ किलोमीटर फरपटत नेलं. या फरपटीत अंजलीचा मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर दुचाकीवर असलेली तिची मैत्रिण निधीने अंजली मद्यप्राशन केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना आता अंजलीच्या आईने निराधार ठरवलं आहे.
१ जानेवारीला पहाटे २ च्या सुमारास सुलतानपूर परिसरात अंजलीच्या दुचाकीचा अपघात झाला होता. अपघातानंतर अंजलीचा मृतदेह सुलतानपूर कंझावाला असं १२ किलोमीटर फरपटत कारने नेला. दुचाकीवर अंजलीची मैत्रिण निधीही होती. पण, अपघातात ती किरकोळ जखमी झाली. अपघातानंतर निधी घरी निघून गेली. तिने कोणाजवळही अपघाताबद्दल वाच्यता केली नाही.
हेही वाचा : अंजलीचा मृतदेह कारला लटकलेला असताना त्याच मार्गावरून पोलिसांची ९ वाहने गेली, पण…; वाचा नेमकं काय घडलं
पोलीस तपासावेळी अंजलीसह दुचाकीवर तिची मैत्रिणही असल्याचं समोर आल्यानंतर निधीने आपला जबाब नोंदवला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निधीने अंजलीवर गंभीर आरोप केले होतं. “अपघातापूर्वी अंजलीने मद्यप्राशन केलं होतं. तरीही तिने दुचाकी चालवण्याचा हट्ट धरला. अपघात झाल्यावर अंजली कारखाली फरपटत गेली. मी घाबरून घरी आले आणि अपघाताबद्दल कोणालाही बोलले नाही. अपघातासाठी मद्यधुंद असलेल्या अंजलीची चूक आहे,” असं निधीने म्हटलं होतं.
निधीच्या आरोपांवर अंजलीच्या आईने प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत. “मी निधीला ओळखत नाही किंवा तिला कधीही पाहिजे नाही. अंजलीने कधीही मद्यप्राशन केलं नाही. तसेच, कधीही मद्यधुंद अवस्थेत अंजली घरी आली नाही. निधी खरेच अंजलीची मैत्रिण असती तर अपघातानंतर ती निघून का गेली? हा अपघात एक षडयंत्र आहे. निधीची चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी अंजलीच्या आईने केली आहे.
अंजलीचे काका प्रेम निधी आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “या अपघाताची माहिती निधीने का दिली नाही. ती खोटं बोलत आहे. निधीने पोलीस आणि आपल्या कुटुंबाला अपघाताबद्दल का सांगितलं नाही. पोलीस योग्य दिशेने तपास करत आहे. पण, त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. हा अपघात नाहीतर खून आहे. निधीवर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे,” असं प्रेम यांनी सांगितलं.