Anna Hazare Reaction on Arvind Kejriwal Resignation : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दोन दिवसांपूर्वी ते तुरुंगातून बाहेर पडले. ते मागी १७७ दिवसांपासून तिहार तुरुंगात होते. दरम्यान, केजरीवाल यांनी आज (१५ सप्टेंबर) आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली. केजरीवाल यांनी म्हटलं आहे की ते पुढील दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहोत. केजरीवालांच्या या घोषणेनंतर दिल्लीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या निर्णयावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच केजरीवाल यांचे जुने सहकारी, जनलोकपाल आंदोलनाचे प्रमुख अण्णा हजारे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ समाजसेक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे की मी अरविंद केजरीवाल यांना राजकारणात जाण्यास मनाई केली होती. मी त्यांना आधीच म्हटलं होतं की राजकारणात नका जाऊ. त्याऐवजी समाजाची सेवा करा. जनतेची सेवा करून खूप मोठे व्हाल. आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो. त्यावेळी मी केजरीवाल यांना अनेकदा म्हटलं होतं की राजकारणात जाऊ नका. समाजसेवेतूनच खरा आनंद प्राप्त होतो. परंतु, त्यांनी माझं ऐकलं नाही, त्यांना त्या गोष्टी कदाचित पटल्या नसतील. त्यामुळे आज जे व्हायचं ते झालं आहे. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ते मला माहिती नाही.

हे ही वाचा >> Arvind Kejriwal : केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री? ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर

राजीनाम्याची घोषणा करताना केजरीवाल काय म्हणाले?

येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी आणि मनिष सिसोदिया (आप नेते तथा दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री) आम्ही दोघेही दिल्लीतल्या जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यानंतर जनतेला आम्ही प्रामाणिक वाटत असलो तर आम्हाला ते निवडून देतील.

हे ही वाचा >> Arvind Kejriwal : “…म्हणून केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दोन दिवस मागितले”, भाजपाचा मोठा आरोप

…तर दिल्लीच्या जनतेने आम्हाला निवडून देऊ नये : केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, “आता दोन दिवसांत आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्या बैठकीत माझ्याऐवजी आम आदमी पक्षामधील दुसऱ्या नेत्याची मुख्यमंत्रिपदी निवड केली जाईल. आता दिल्लीच्या जनतेचा निर्णय येत नाही तोवर मी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही. आता थेट दिल्लीच्या नागरिकांनी मला पुन्हा निवडून दिल्यानंतरच मी आणि मनिष सिसोदिया आम्ही पद व राज्याची जबाबदारी स्वीकारणार आहोत. जनतेला मी प्रामाणिक वाटत असेन तरच जनतेने आम्हाला निवडून द्यावं आणि जर मी प्रामाणिक नसेन तर जनतेने निवडून आम्हाला देऊ नये”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare reaction on arvind kejriwal resignation statement asc