Anura Dissanayake Stand on India, Tamil People in Sri Lanka : मार्क्सवादी नेते अनुरा कुमार दिसानायके यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. दिसनायके हे मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) या पक्षाच्या नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) आघाडीचे नेते आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी समगी जन बलवेगया (एसजेबी) पक्षाचे नेते सजित प्रेमदासा यांचा पराभव केला आहे. दरम्यान, दिसनायके श्रीलंकेचे अध्यक्ष झाल्यानंतर आता भारत व श्रीलंकेचे आगामी काळातील संबंध कसे असतील? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच दिसनायके यांच्या भारताबाबत व तमिळ जनतेबाबत काय भूमिका आहेत? याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं आहे.

श्रीलंका हे भारताचं महत्त्वाचं शेजारील राष्ट्र आहे. हिंदी महासागरात चीनच्या हालचाली, भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत. या काळात भारताने श्रीलंकेबरोबरचे संबंध जपले आहेत. मात्र, श्रीलंकेत आता सत्तांतर झालं आहे. त्यांच्या नव्या अध्यक्षांच्या, सत्ताधारी पक्षाच्या भारताबद्दल काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा >> Anura Dissanayake : कोण आहेत श्रीलंकेचे नवे अध्यक्ष अनुरा दिसनायके? २०१९ च्या निवडणुकीत ३ टक्के मतं, मग २०२४ मध्ये कसं केलं पुनरागमन?

तमिळ लोकांना विरोध?

दिसनायके यांच्या जेव्हीपी पक्षाने अनेकदा भारतातून श्रीलंकेत गेलेल्या तमिळ वंशाच्या लोकांचा विरोध केला आहे. त्यास जेव्हीपीने भारताचं विस्तारवादी साधन म्हटलं आहे. तसेच जेव्हीपीने भारत व श्रीलंकेतील व्यापारावरील सर्वसमावेश आर्थिक भागीदारी कराराला (सीईपीए) विरोध केला आहे. या करारामुळे उभय देशांमधील व्यापार वाढणार आहे. तसेच गुंतवणुकीला चालना मिळेल.

हे ही वाचा >> नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

भारताविषयी नकारात्मक भूमिका

श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिसनायके यांनी कच्चातिवू बेट भारताला परत करण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शवला आहे. कोणत्याही किंमतीत कच्चातिवू बेट भारताला देऊ देणार नाही, असं त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. भारत सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला दिसनायके आणि जेव्हीपीच्या शिष्टमंडळाला अधिकृत भेटीसाठी भारतात निमंत्रित करण्यासाठी संपर्क केला होता. मात्र त्यांची भारताविषयीची भूमिका नकारात्मक होती.

हे ही वाचा >> मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

एनपीपीचे भारताबाबत धोरण काय?

अनुरा दिसानायके यांनी १९८७ मध्ये ‘एनपीपी’चा मातृपक्ष असलेल्या ‘जेव्हीपी’मध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यावेळी ‘जेव्हीपी’ भारतविरोधी बंडामध्ये सहभागी होता. त्या पक्षाने १९८७ च्या राजीव गांधी आणि जे. आर. जयवर्देना यांच्यादरम्यान झालेल्या भारत-श्रीलंका कराराला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हटवले होते. हा करार म्हणजे श्रीलंकेच्या सार्वभौमत्वावर घाला आहे असा आरोप तेव्हा ‘जेव्हीपी’ने केला होता. मात्र, दिसानायके यांनी फेब्रुवारी २०२४मध्ये भारताचा दौरा करून आपली भारताविषयीची भूमिका बदलल्याचे संकेत दिले होते.