आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि १२ वी राष्ट्रीय परिषद पार पडली. दृकश्राव्य माध्यमातून पार पडलेल्या या दोन्ही बैठकांमध्ये पक्षाचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. संदीप पाठक हे केजरीवाल यांच्याबरोबर सभागृहात उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बैठकीवेळी अरविंद केजरीवाल म्हणाले, गेल्या १२ वर्षांमध्ये आपल्या पक्षाने देशभर अभूतपूर्व यश मिळवलं आहे. ७५ वर्षांमध्ये देशातल्या इतर कुठल्याही पक्षाला जमली नाही अशी कामगिरी आपण गेल्या काही वर्षांमध्ये केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये पंजाबमध्ये आप सरकारने केलेलं काम पाहता असं लक्षात येतंय की संपूर्ण राज्यात आपली सत्ता असेल तर अधिक वेगाने काम करता येतं.

केजरीवाल म्हणाले, राष्ट्रीय राजकारणात आपचा मोठा प्रभाव आहे. देशात पहिल्यांदाच देशातले विरोधी पक्ष शाळा आणि रुग्णालयांवर बोलू लागले आहेत. यातल्या काही लोकांनी आपला ‘गॅरंटी’ हा शब्द आणि जाहिरनामादेखील चोरला आहे. आता हे लोक ‘मोदी की गॅरंटी’ आणि ‘काँग्रेस की गॅरंटी’ असा प्रचार करू लागले आहेत. या लोकांनी गॅरंटी दिली खरी, परंतु. ती आश्वासनं पूर्ण केली नाहीत. कारण या लोकांचा हेतू स्वच्छ नाही. मात्र, आपने दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, आपले पाच नेते तुरुंगात आहेत. ते आपले हिरो आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. तुम्ही मुलांना चांगलं शिक्षण देण्याबद्दल, रुग्णांवर मोफत उपचार करण्याबद्दल बोलू लागलात तर तुम्हाला तुरुंगात तर जावंच लागेल आणि आपण यासाठी तयार असलं पाहिजे. गेल्या १० वर्षांमध्ये आपला पक्ष देशातल्या नोंदणीकृत १,३५० पक्षांमध्ये तिसऱ्या नंबरवर आला आहे. देशातील जनतेला यापैकी केवळ ५ ते १० पक्ष माहिती आहेत. आपणही त्या १,३५० पक्षांप्रमाणे यशस्वी झालो नसतो तर काहीच चांगलं करू शकलो नसतो आणि आपल्या पक्षाचा कुठलाच नेता तुरुंगात गेला नसता. आज आपले सगळे नेते आपल्याबरोबर त्यांच्या कुटुंबाबरोबर नवीन वर्ष साजरं करत बसले असते. जनतेच्या भल्यासाठी आपण जो मार्ग निवडला आहे, त्यावर चालत राहिलो तर आपल्याला तुरुंगात तर जावंच लागेल.

हे ही वाचा >> IIT BHU मधील सामूहिक बलात्कार प्रकरण; तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे सदस्य? पक्षाने स्पष्ट केली भूमिका

“देशातल्या दोन मोठ्या पक्षांनी देशावर ७५ वर्षे राज्य केलं आहे. हे लोक इतक्या सहजपणे सत्ता सोडणार नाहीत. प्रत्येकाला ज्याचा त्याचा संघर्ष करावा लागतो. परंतु, निराश होण्याची आवश्यकता नाही. आपले जे पाच नेते आज तुरुंगात आहेत ते आपले हिरो आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. मी सातत्याने वकिलांच्या संपर्कात आहे. तुरुंगात असलेल्या आपल्या नेत्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, त्याच दिवशी मला त्यांचा मेसेज आला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, काहीच अडचण नाही, सगळं काही ठीक आहे. मला जितके दिवस तुरुंगात ठेवलं जाईल, तेवढे दिवस मी इथे राहीन. हा संपूर्ण खटला बोगस असून माझा लढा चालूच राहील.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal says will have to go to jail for paths we have chosen aap meeting asc