Ashwini Vaishnaw on Privatising Railways : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुढील पाच वर्षांमध्ये भारतीय रेल्वेचा कायापालट करू असं आश्वासन जनतेला दिलं आहे. रेल्वेमंत्री म्हणाले, “भारतीय नागरिकांचा रेल्वे प्रवास सुरक्षित करण्याबरोबरच रेल्वेचा वेग वाढवणे हे आपल्या सरकारचे प्रमुख उद्दीष्ट आहे”. दरम्यान, वैष्णव यांनी रेल्वेच्या खासगीकरणाशी संबंधित प्रश्नावरही उत्तर दिलं. तसेच सामान्य नागरिकांसाठी रेल्वेच्या सुविधा वाढवण्यासाठी सरकार काम करत असल्याचं सांगितलं.

वेष्णव यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे अधिक सोयीस्कर कशी बनवता येईल यासाठी काम करत आहे. आपल्या देशातील सामान्य नागरिकांनी अवघ्या ४०० रुपयांमध्ये लग्झरी सुविधांचा लाभ घेत १,००० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करावा, हे आमचं उद्दीष्ट आहे. त्यासाठीचा रोडमॅप आम्ही तयार केला आहे”.

हे ही वाचा >> इस्रायल भारताबरोबर आहे का? ‘त्या’ वादग्रस्त नकाशावरून टीकेनंतर नेतान्याहू सरकार म्हणाले “आम्ही तातडीने…”

अश्विनी वैष्णव म्हणाले, “पुढील पाच वर्षांत भारतीय रेल्वेचा संपूर्ण कायापालट झालेला तुम्ही पाहू शकाल. वंदे भारत व नमो भारतसारख्या ट्रेनमध्ये आम्ही प्रवाशांना लग्झरी सुविधा देणार आहोत. यासह कवचसारखी सुरक्षा देखील प्रदान करणार आहोत. जास्तीत जास्त रेल्वेगाड्यांमध्ये ही प्रणाली असेल. पुढील पाच वर्षे भारतीय रेल्वेसाठी खूप महत्त्वाची असणार आहेत. या काळात रेल्वेत खूप मोठमोठे बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. रेल्वेमंत्री नाशिकमध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या वार्षिक स्नेहंसमेलनात बोलत होते”.

हे ही वाचा >> Ayatollah Khamenei : “..तर इस्रायल फार काळ टिकणार नाही”, इराणच्या अयातुल्लाह खोमेनींचं पाच वर्षांत पहिल्यां

रेल्वेच्या खासगीकरणाबाबतच्या चर्चेवर अश्विनी वैष्णव नेमकं काय म्हणाले?

रेल्वे सध्या काही खासगी ट्रेन चालवत आहे. यासह केटरिंग सेवांसह इतर काही सेवांसाठी खासगी कंपन्यांबरोबर काम करत आहेत. अनेक खासगी कंपन्या रेल्वेचा वापर करत आहेत. यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेच्या खासगीकरणाची चर्चा होत आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. या अफवा पसरवणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो की, रेल्वे व संरक्षण विभाग भारताचा कणा आहेत. राजकारणापासून या दोन विभागांना दूर ठेवायला हवं.

हे ही वाचा >> Kim Jong-un : इस्रायल-इराण, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान किम जोंग-उनची आण्विक हल्ल्याची धमकी, ‘या’ देशाची चिंता वाढली

रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेवरून होणारं राजकारण थांबेल यांची काळजी घेतली आहे. उत्तम कामगिरी, प्रवाशांची सुरक्षा, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनसामान्यांना परवडेल अशी रेल्वेसेवा प्रदान करण्यावर आमचं लक्ष आहे”.