Assam Minor Gangrape Case : आसाम येथील नागाव जिल्ह्यात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू झाला आहे. पोलीस कोठडीत असताना पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्याने तलावात उडी मारली, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

आसाम येथील नागाव जिल्ह्यातील धिंग परिसरात एका १४ वर्षीय मुलीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात तिघांची नावे समोर येत. यामध्ये तफाझुल इस्लाम (२४) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय सुरक्षा संहिता आणि POSCO कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SDRF ने शोधला मृतदेह

पोलीस आरोपीला घटनास्थळी घेऊन जात होते. तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने तलावात उडी मारली. परंतु, त्याचा मृत्यू झाला. तलावात त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी तत्काळ एसडीआरएफला पाचारण केलं. एसडीआरएफने शोधल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, अशी माहिती नागवच्या पोलीस निरिक्षकांनी दिली. तसंच, ज्या हवालदाराने त्याला हातकड्या बांधल्या होत्या, त्यांनाही दुखापत झाली आहे. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलंय, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

हेही वाचा >> आसाममध्ये जोरदार निदर्शने; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

चिमुकलीवर आपबिती कशी ओढावली

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास धिंग परिसरात दहावीत शिकणारी विद्यार्थिनी शिकवणी संपवून सायकलवरून घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी हल्ला करत तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला जखमी आणि बेशुद्धावस्थेत एका तलावाजवळ रस्त्याच्या कडेला सोडून दिले. स्थानिकांनी तिला पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली.

मुख्यमंत्री सर्मा यांनी हैलाकांडी येथे पत्रकारांना सांगितले की, धिंग येथील अल्पवयीन हिंदू मुलीबरोबर असा क्रूर गुन्हा करण्याचे धाडस करणाऱ्या गुन्हेगारांना कायदा सोडणार नाही. सर्मा यांनी आरोप केला की, ‘लोकसभा निवडणुकीनंतर एका विशिष्ट समुदायातील सदस्यांचा एक भाग खूप सक्रिय झाला आहे आणि त्यांना अशा प्रकारचा गुन्हा करण्यास उसकवलं जातं आहे. मात्र, आम्ही गुन्हेगारांवर कडक कारवाई करू आणि कुणालाही सोडले जाणार नाही.’

हेही वाचा >> Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?

दरम्यान, गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी करत समाजातील विविध स्तरातील लोक शुक्रवारी सकाळी रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी त्यांचे व्यवसाय बंद ठेवत सामाजिक आणि राजकीय संघटनांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेची मागणी केली.