आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यातील मुस्लीम लोकसंख्येबाबत मोठा दावा केला आहे. २०४१ पर्यंत आसाम मुस्लीम बहुल राज्य होईल, असे ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विरोधकांकडूनही त्यांना आता लक्ष्य करण्यात येत आहे.

शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हा दावा केला आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक शब्दात टीकाही केली आहे.

हेही वाचा – सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आता चहाही महागणार? कारण काय?

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा?

सध्याची आकडेवारी बघता राज्यात ४० टक्के लोकसंख्या मुस्लीम असून आसाममधील मुस्लीम लोकसंख्या दर १० वर्षांनी जवळपास ३० टक्क्यांनी वाढते आहे. त्यानुसार २०४१ पर्यंत आसाम हे मुस्लीमबहुल राज्य होणार आहे, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. तसेच हे राज्य मुस्लीमबहुल बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

पुढे बोलताना, मुस्लिमांच्या तुलनेत आसाममधील हिंदू समाजाची लोकसंख्या दर १० वर्षांनी १६ टक्क्यांपर्यंत वाढत असून भाजपा सरकार मुस्लीम लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “वरिष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रिपदावरून हटवल्याने…”, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हेमंत सोरेन, JMM-काँग्रेसवर हल्लाबोल

राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका

यावेळी बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांनाही लक्ष्य केलं. जर राहुल गांधी हे लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रॅंड अॅम्बेसेडर झाले, तर मुस्लिमांची वाढती लोकसंख्या रोखण्यास मदत होईल, कारण मुस्लीम समाज केवळ राहुल गांधी यांचे ऐकतो, अशी खोचक टीका त्यांनी केली.