पीटीआय, नवी दिल्ली
राजधानी दिल्लीतील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जलमंत्री अतिशी यांनी बुधवारी पाणीटंचाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत तसेच येत्या दोन दिवसांत यावर तोडगा न काढल्यास २१ जूनपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत अतिशी यांनी मोदींना पत्र पाठवल्याची माहिती दिली. तसेच हरियाणा दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडत नसल्याने दिल्लीला जलसंकटाला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हरियाणाने मंगळवारी दिल्लीला ६१३ ऐवजी ५१३ दशलक्ष गॅलन पाणी सोडले. एक दशलक्ष गॅलन पाणी २८,५०० नागरिकांना पुरते. म्हणजेच २८ लाखांहून अधिक नागरिकांसाठी पाणी सोडलेच नाही, असा दावा अतिशी यांनी केला. आधीच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त असताना, त्यात पाणीटंचाईचीही भर पडल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जलसंकटावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. येत्या दोन दिवसांत यावर तोडगा काढला नाही तर २१ जूनपासून मी बेमुदत संपावर जाईन, असा इशाराही अतिशी यांनी दिला. पाणीटंचाईच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हरियाणा सरकारला अनेक पत्रे लिहिल्याचेही अतिशी यांनी या वेळी नमूद केले.
© The Indian Express (P) Ltd