नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर हे शहर आता देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या शहराला वर्षांला किमान पाच कोटी पर्यटक भेट देऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरापेक्षाही अयोध्येतील राम मंदिरात अधिक भाविकांचा ओघ असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>दोन आठवडयांमध्ये उत्तर द्या! महिलांसाठी राखीव जागा याचिकेवर केंद्र सरकारला निर्देश
‘ब्रोकरेज जेफरीज’ने एका अहवालात अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला आहे. नवे विमानतळ, सुधारित रेल्वे स्थानक, शहराचे सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधा यांवर मोठया प्रमाणात खर्च केल्याने उत्तर प्रदेशातील हे शहर आगामी काळात देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र असेल. अयोध्येचा कायापालट करण्यासाठी सुमारे एक हजार कोटी डॉलर खर्च करण्यात आले असून पर्यटकांसाठी नवी हॉटेल व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.
नवे विमानतळ, सुधारित रेल्वे स्थानक, शहराचे सुशोभीकरण यातून अयोध्या आगामी काळात देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र असेल.
धार्मिक पर्यटन हा अजूनही भारतातील पर्यटनाचा सर्वात मोठा भाग आहे. अनेक लोकप्रिय धार्मिक केंद्रे पायाभूत सुविधांतील अडथळे असूनही वर्षांला एक ते तीन कोटी पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळेच पायाभूत सुविधांसह नवे धार्मिक पर्यटन केंद्र तयार केल्याने त्याचा मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. पर्यटनामुळे अयोध्येत आर्थिक व धार्मिक स्थलांतर वाढेल, असा अंदाज असून हॉटेल, हवाई वाहतूक, आदरातिथ्य, पर्यटन यांसह विविध क्षेत्रांना फायदा होणार आहे, असे ‘ब्रोकरेज जेफरीज’ने म्हटले आहे.
धार्मिक पर्यटन केंद्रे
अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात वर्षांला अंदाजे ३ ते ३.५ कोटी तर तिरुपती बालाजी मंदिराला २.५ ते ३ कोटी पर्यटक भेट देतात. जागतिक स्तरावर व्हॅटिकन सिटीला दरवर्षी ९० लाख पर्यटक येतात. सौदी अरेबियातील मक्का येथे दरवर्षी दोन कोटी पर्यटक भेट देतात.