बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले आहेत. आधी ते त्यांच्या दरबारात दावा केल्या जाणाऱ्या चमत्करांमुळे चर्चेत आले. त्यावर अंनिसशी त्यांची खडाजंगी आणि आव्हान-प्रतिआव्हानही झालं. त्यानंतर त्यांनी मुलाखतींमधून केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ते चर्चेत आले. नुकतंच त्यांनी संत तुकाराम यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान करून त्यावर माफी मागितली होती. ते वादळ शांत होत नाही तोच त्यांनी साईबाबा यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केलं. त्यावरून वाद सुरू झाल्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी त्याबाबतही माफीनामा जारी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साईबाबांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून वाद

धीरेंद्र शास्त्री यांनी जबलपूरमध्ये भाविकांशी संवाद साधताना साईबाबांविषयी एक विधान केलं होतं. ते विधान वादात सापडलं होतं. एका भाविकाने साईबाबांची पूजा करावी की नाही? असा प्रश्न धीरेंद्र शास्त्रींना विचारताच “गिधाडाचं चामडं पांघरूण कुणी सिंह होत नाही”, अशी म्हण सांगत त्यांनी उत्तर दिलं होतं. “आपल्या शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचं स्थान दिलेलं नाही. शंकराचार्यांचं मत हे बंधनकारक आहे. शंकराचार्य हे सनातनी धर्माचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे प्रत्येक सनातनी धर्माने त्यांचं ऐकलं पाहिजे. आम्ही कोणाच्याही भावनेचा अपमान करत नाही. साईबाबा संत असू शकतात. फकीर असू शकतात. मात्र, ते देव होऊ शकत नाही”, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते.

धीरेंद्र शास्त्री यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर धीरेंद्र शास्त्रींनी बागेश्वर धामच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माफीनामा जाहीर केला आहे. “मी नेहमीच संत आणि महापुरुषांचा सन्मान ठेवला आहे आणि कायम ठेवेन. मी एक म्हण सांगितली होती. त्याचा साधारण अर्थ होता की जर आपण मागे छत्री लावून म्हणालो की आम्ही शंकराचार्य आहोत, तर हे कसं होऊ शकेल. आपल्या शंकराचार्यांनी जे सांगितलं, तेच मी पुन्हा सांगितलं”, असं या ट्विटमध्ये धीरेंद्र शास्त्रींनी म्हटलं आहे.

“साईबाबा संत असू शकतात, पण देव नाही” धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्यानंतर भाजपाचे मंत्री संतापले; म्हणाले…

“आपल्या शंकराचार्यांनी म्हटलंय की साईबाबा संत-फकीर असू शकतात. त्यांच्यावर लोकांची वैयक्तिक श्रद्धा आहे. जर कुणी व्यक्ति वैयक्तिक आस्थेपोटी एखाद्या संत-गुरुंना ईश्वर मानत असेल, तर ती त्याची वैयक्तिक आस्था आहे. आमचा त्याला कोणताही विरोध नाही. माझ्या कुठल्या शब्दामुळे कुणाचं मन दुखावलं गेलं असेल, तर आम्हाला त्याचं मनापासून दु:ख आणि खेद आहे”, असंही धीरेंद्र शास्त्रींनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

संत तुकाराम यांच्याविषयीही आधी विधान, नंतर माफी

दरम्यान, याआधीही संत तुकाराम यांच्याविषयी धीरेंद्र शास्त्री यांनी आधी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर माफी मागितली होती. “तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारहाण करायची म्हणून ते भक्तीमार्गाला लागले”, असं विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केलं होतं. त्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर शास्त्री यांनी हे विधान मागे घेतलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bageshwar dham dhirendra shastri apologized for controversy over sai baba statement pmw
Show comments