भाजपाकडे ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पोस्टर चिकटवण्यासाठी माणसं नव्हती. भारतीय जनता पार्टीचा जय म्हणायला तेव्हा दोन टाळकीही नव्हती. अशा वेळी भाजपाला खांद्यावर घेऊन गावागावांत शिवसैनिक फिरले. महाराष्ट्रातल्या भाजपाला शिवसेनेने वाढवलं हे सांगायला कुणीही पंडिताची गरज नाही. देशात कुणालाही विचारलंत तरीही त्याचं उत्तर मिळेल असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपा महाराष्ट्रात कुणामुळे वाढला, फोफावला, तरारला, फुगला आणि सुजला हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांना जर हे आमच्याविषयी वाटत असेल तर भाजपाला एकच आव्हान आहे त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुणालाही विचारा महाराष्ट्रात भाजपा कुणामुळे वाढली?

मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुकांपासून तुम्ही का पळ काढता आहात? त्याचं उत्तर द्या. निवडणुका घेतल्या की कोण कोणामुळे मोठं झालं याचं उत्तर जनता देईल. आपण कोण होतात, काय झालात आणि कुणामुळे झालात? याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. हिंदू संस्कृतीमध्ये कृतज्ञता या शब्दाला महत्व आहे. हिंदुत्व जर भाजपा मानत असतील तर कृतज्ञता आणि उपकारांची जाण या दोन शब्दांचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा. बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक वेळी भाजपासाठी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला आहे. त्याचं स्मरण हे नव्या पिढीने करावं, त्यांना माहीत नसेल तर आम्ही सांगायला तयार आहोत. आज गोपीनाथ मुंडे नाहीत, लालकृष्ण आडवाणी एका बाजूला आहेत. आडवाणी यांनाही विचारलं तरीही ते सांगतील महाराष्ट्रात भाजपा कुणामुळे वाढली? असंही संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन हटवलं जाणार होतं

नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचं पालन करण्यासाठी घेतला होता. त्यावेळी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांना सांगितलं की गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन मोदींना हटवलंत तर गुजरात हातचं जाईल आणि हिंदुत्वाचं नुकसान होईल. त्यावेळी वाजपेयींनी निर्णय मागे घेतला. आज तेच मोदी दिल्लीत आहेत. त्याच मोदींच्या जोरावर हे महाराष्ट्रातले ओंडके, सोंडके डोळे वटारुन दाखवत आहेत. २०२४ ला हे नसेल असं राऊत यांनी भाजपाला ठणकावलं आहे.

काँग्रेस आघाडीची बैठक बुधवारी

काँग्रेसने कुठली भूमिका घ्यायला पाहिजे त्याबाबत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे हे बुधवारी दिल्लीत येणार आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील. पाच राज्यांचा जो निकाल लागला आहे त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. काँग्रेसला या निवडणुकीत ४० टक्के मतदान झालं आहे. ४० टक्के मतदान होणं ही लहान गोष्ट नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीची बैठक घाईने ठरलेली नाही. निवडणूक निकालाच्या आधीपासूनच या बैठकीची तारीख ठरली होती.

आशिष शेलार खालच्या पातळीचे

आशिष शेलार हे खालच्या पातळीचे आहेत त्यामुळे ते खालच्या पातळीचंच बोलणार. आमच्या पक्षाकडे सांगण्यासारखं आहे म्हणून मी सांगतो. बाकी आम्ही कुणाला निमंत्रण देऊन बोलवून घेत नाही. अहंकार असतो काहींना अशा लोकांविषयी काय बोलणार? असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेंचं काय होणार हे त्यांनीच सांगावं

एकनाथ शिंदे यांचं काय होणार ते एकनाथ शिंदेंनी सांगितलं पाहिजे, अजित पवारांनी सांगितलं पाहिजे आणि अजित पवारांनी सांगितलं पाहिजे. चंद्रेशखर बावनकुळे जर म्हणत असतील की २०२४ ला फडणवीस मुख्यमंत्री होतील तर हे उत्तर भाजपानेही दिलं पाहिजे. लग्न दोघांमध्ये होत असतं हे लग्न तिघांमध्ये झालं आहे. त्यामुळे संसार सध्या तिघांचा आहे. आम्हीही युतीत होतो पण आमचं बरं चाललं होतं. आमच्यात असे वाद नव्हते असंही राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray saved modi chief ministership at that time sanjay raut told the whole story scj