Balochistan Attack Gunmen Killed 20 Miners in in southwestern Pakistan : पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातून खळबजनक घटना समोर आली आहे. येथील एका कोळसा खाणीवर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात खाणकाम करणाऱ्या २० मजुरांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बलूचिस्तान प्रांत वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक तणावामुळे गेल्या काही महिन्यांपासून धगधगतोय. अशातच आज पुन्हा एकदा या प्रांतात खळबळजनक घटना घडली आहे. पाकिस्तानमध्ये एससीओ बैठकीमुळे (Shanghai Cooperation Organization (SCO) Council of Heads of Government meeting) संरक्षण यंत्रणा सतर्क असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीच्या सुरक्षेच्या कारणास्वत देशभऱात लग्नकार्य आणि इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या संख्येने लोक जमू शकतात अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. अशातच बलूचिस्तानमधील कोळसा खाणीवरील या हल्ल्याने पाकिस्तानमधील सरकार व सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.

स्थानिक पोलीस अधिकारी हुमायून खान नासिर म्हणाले, “काही बंदूकधारी लोकांनी गुरुवारी रात्री डुकी जिल्ह्यातील कोळसा खाणीजवळ राहणाऱ्या लोकांच्या घरांना घेराव घातला. त्यानंतर या लोकांनी अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये २० जण जागीच ठार झाले आहेत, तर सातजण गंभीररित्या जखमी झाले आहेत”. मृतांमधील बहुसंख्य लोक हे बलूचिस्तानमधील पश्तून-भाषी भागातून आले होते. तसेच मृतांमध्ये तीन अफगाणिस्तानी लोक आहेत. जखमींमध्येही काही अफगाणिस्तानी लोक आहेत. दी मिंटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा >> सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू; बदलापूर घटनेची पुनरावृत्ती?

हल्याचं कारण काय? हल्लेखोर कोण होते?

हा हल्ला कोणी केला होता याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. प्रसारमाध्यमांनी याबाबत पोलिसांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही हल्ल्याचं कारण आणि हल्लेखोरांचा शोध घेत आहोत. तसेच कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

हे ही वाचा >> CJI Chandrachud : न्यायालयीन निर्णय घेताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? सरन्यायाधीश चंद्रचुडांनी दिलं उत्तर

बलूचिस्तानच्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात फुटीरतावादी नेते राहतात, त्याच भागात ही खाण आहे. या फुटीरतावादी नेत्यांनी आजवर कित्येकदा पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी केली आहे. पाकिस्तानी सरकार स्थानिक लोकांचं शोषण करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. हा तेल व खनिजसंपन्न भाग आहे. पाकिस्तानी सरकार खनिजांसाठी येथील लोकांची व या भागाची लूट करत असल्याचा आरोप होत आहे.

हे ही वाचा >> उपाशी ठेवून भीक मागायला सांगितलं, पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ; वृद्ध दाम्पत्यानं जीवन संपवलं

दरम्यान, सोमवारी (७ ऑक्टोबर) बलूच लिबरेश आर्मी नावाच्या एका गटाने दावा केला होता की त्यांनी पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या विमानतळाबाहेर चिनी नागरिकांवर हल्ला केला होता. देशात हजारो चिनी लोक काम करत आहेत.