USA On Bangladesh Political Crisis : बांगलादेशमध्ये राजकीय भूकंप झाला असून शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. इतकंच नव्हे, तर त्यांना देश सोडून जावं लागल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या घडामोडींची चर्चा पाहायला मिळत आहे. येथील अराजक परिस्थितीवर आता जगभरातील देशांकडून चिंताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बांगलादेशमधील परिस्थितीबाबत आता अमेरिकेनेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यालयाचे प्रवक्ते काय म्हणाले?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशमधून पलायन केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही येथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. अमेरिका येथील लोकांबरोबर आहे. आम्ही सर्वच घटकांना हिंचासार न करण्याचे आवाहन करत आहोत. मागच्या काही दिवसांत अनेकांनी आपला जीव मगावला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी शांती राखावी, असे ते म्हणाले.

हेही वाचा – शेख हसीना भारतात अजित डोवाल यांना भेटल्या, पुढची रणनीती ठरली?…

हेही वाचा – बांगलादेशप्रकरणी भारताची सर्वपक्षीय बैठक सुरू, परराष्ट्र मंत्री कोणता निर्णय घेणार?

अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या निर्णायाचं स्वागत

पुढे बोलताना त्यांनी बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाचंही स्वागत केलं. बांगलादेशच्या लष्कराने देशाची सूत्र हातात घेतली असून तिथे लवकरच अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मात्र, तोपर्यंत कोणतेही निर्णय कायद्यानुसार घेतले जातील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच बांगलादेशमधील मानवाधिकाराचं उल्लंघन झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्या अतिशय दुर्दैवी आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा- बांगलादेशला राजकीय अस्थिरता कधी चुकलीच नाही; स्थापनेपासून आजतागायत अनेकदा बसले धक्के!…

बांगलादेशातल्या हिंसाचारात १०० हून जास्त लोकांचा बळी

दरम्यान, बांगलादेशमध्ये चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. आंदोलकांनी शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांचं कार्यालयही जाळलं आहे. शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांनी देश सोडल्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. तसेच बांगलादेशच्या लष्करांने प्रशासनावर तात्पुरता ताबा घेतला आहे. आरक्षणाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं. यानंतर सध्या बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बांगलादेशमधील इंटरनेट सेवा देखील अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.