Bangladesh Protests : बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (दि.५ ऑगस्ट) आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडत सुरक्षित स्थळी रवाना झाल्या आहेत. वृत्तानुसार शेख हसीना या भारतमार्गे लंडनला रवाना होण्याची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार काही वृत्तसंस्थांनी दिली आहे.

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात झालेल्या आंदोलन आणि हिंसाचारामध्ये तब्बल १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. बांगलादेशमधील या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून शेख हसीना यांचं कार्यालयही जाळलं असल्याची माहिती समोर आली आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेच्या लष्करांनी प्रशासनावर तात्पुरता ताबा घेतला आहे. आरक्षणाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं. यानंतर सध्या बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. बांगलादेशमधील इंटरनेटची सेवाही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : Bangladesh Protests : बांगलादेशच्या घडामोडींचे भारतातही पडसाद, सीमेवर बंदोबस्त वाढवला, रेल्वे सेवा तात्पुरती रद्द

दरम्यान, शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थांनी घुसून धुडगूस घातला आहे. यासंदर्भातील काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. तसेच निवासस्थांनातील वस्तूंची तोडफोड करत शेख हसीना यांच्या घरातील स्वंयपाक घरात शिरत तेथील बिर्याणीवरही आंदोलकांनी ताव मारला. तर काही आंदोलक शेख हसीना यांच्या बेडवर जाऊन उड्या मारताना दिसले. आंदोलकांनी घरातील प्राण्यांनाही सोडले नाही. ससे, मासे, राजहंस असे प्राणीही आंदोलकांनी पळविले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ढाका शहरात रस्त्यांवर अद्यापही आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असून शेख हसीना या पदावरून पायउतार झाल्याचा आनंद आंदोलक व्यक्त करताना दिसत आहेत.

बांगलादेशच्या घडामोडींचे भारतातही पडसाद

बांगलादेशमध्ये घडलेल्या घडामोडींचे पडसाद भारतातही दिसले आहेत. केंद्र सरकारने भारत बांगलादेश सीमेवर अनेक सैन्य तुकड्या पाठवल्या आहेत. बांगलादेशमधील कायदा आणि सूव्यवस्थेची स्थिती पाहता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच बीएसएफचे महासंचालक कोलकात्यात दाखल झाले आहेत. बांगलादेशमधील कायदा आणि सूव्यवस्था सध्या तिथल्या लष्कराच्या हातात आहे. भारत आणि बांगलादेशची सीमा ४,०९६ किलोमीटर पर्यंत पसरली आहे. या संपूर्ण सीमेवरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बीएसएफने बांगलादेश सीमेवरील सर्व चौक्या व सैन्यतळांना अलर्ट जारी केला आहे.

भारतातील २०० हून अधिक रेल्वेगाड्या रद्द

बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात हिंसाचार व जाळपोळीच्या घटना समोर येत आहेत. सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेले लोक शासकीय मालमत्तेचं नुकसान करत आहेत. रेल्वे गाड्यांवर हल्ले होत आहेत. हे सर्व पाहता भारत सरकारने १५ दिवसांपूर्वी कोलकाता-ढाका-कोलकाता मैत्री एक्सप्रेस तात्पुरती रद्द केली होती. ही रेल्वेसेवा अजून काही दिवस बंद असेल.