Bangladesh Protests impacts India BSF on high alert : बांगलादेशमधील राजकीय वातावरण गेल्या महिनाभरापासून अस्थिर आहे. जनतेचा वाढता रोष आणि हिंसाचार पाहून शेख हसीना यांनी आज (५ ऑगस्ट) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला, पाठोपाठ त्यांनी बांगलादेशमधून पलायन केलं आहे. त्या देश सोडून कुठे गेल्या आहेत हे अद्याप माहिती नसलं तरी त्या आश्रयासाठी भारतात येत असल्याचा दावा काही वृत्तसंस्थांनी केला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हिंसाचार थेट बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानापर्यंत पोहोचला. त्यामुळे त्यांना देशाचं प्रमुखपद सोडावं लागलं आहे. तसेच देशातून पलायन करावं लागलं आहे. भारताच्या शेजारील देशात घडत असलेल्या सर्व घटना पाहता हा देश पुन्हा एकदा अस्थिरतेच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे. तसेच बांगलादेशमधील घडामोडींनंतर भारतातही मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. केंद्र सरकारने भारत बांगलादेश सीमेवर अनेक सैन्य तुकड्या पाठवल्या आहेत.

बांगलादेशमधील कायदा आणि सूव्यवस्थेची स्थिती पाहता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच बीएसएफचे महासंचालक कोलकात्यात दाखल झाले आहेत. बांगलादेशमधील कायदा आणि सूव्यवस्था सध्या तिथल्या लष्कराच्या हातात आहे. भारत आणि बांगलादेशची सीमा ४,०९६ किलोमीटर पर्यंत पसरली आहे. या संपूर्ण सीमेवरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बीएसएफने बांगलादेश सीमेवरील सर्व चौक्या व सैन्यतळांना अलर्ट जारी केला आहे.

भारत बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी

हे ही वाचा >> शेख हसीना पुन्हा एकदा भारताच्या आश्रयाला? इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

भारतातील २०० हून अधिक रेल्वेगाड्या रद्द

बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात हिंसाचार व जाळपोळीच्या घटना समोर येत आहेत. सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेले लोक शासकीय मालमत्तेचं नुकसान करत आहेत. रेल्वे गाड्यांवर हल्ले होत आहेत. हे सर्व पाहता भारत सरकारने १५ दिवसांपूर्वी कोलकाता-ढाका-कोलकाता मैत्री एक्सप्रेस तात्पुरती रद्द केली होती. ही रेल्वेसेवा अजून काही दिवस बंद असेल. पाठोपाठ भारतीय रेल्वेने आणखी एक निर्णय घेतला आहे. बांगलादेश सीमेनजिक धावणाऱ्या मालगाड्या व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. भारतीय रेल्वेने २०० हून अधिक रेल्वेगाड्या रद्द केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

हे ही वाचा >> Bangladesh PM Sheikh Hasina Resigns: बांगलादेश अस्थिरतेच्या वाटेवर? शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुखांनी जनतेशी साधला संवाद, म्हणाले…

कोलकाता व खुलना या दोन स्थानकांदरम्यान चालवली जाणारी बंधन एक्सप्रेस १५ दिवसांपासून बंद आहे. बांगलादेशमधील राजकीय संकट पाहता पुढील काही दिवस ही रेल्वेसेवा चालू केली जाणार नसल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं आहे. बंधन एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस चालवली जाते.

दरम्यान, एअर इंडियाने ढाक्यासह बांगलादेशमधील प्रमुख शहरांमध्ये ये-जा करणारी विमानसेवा थांबवली आहे. शेड्यूल केलेली उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याचं एअर इंडियाने जाहीर केलं आहे.