Bangladesh Students Protest: आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात चालू असलेली राजकीय व सामाजिक घुसळण सध्या गंभीर मुद्दा बनली आहे. तर दुसरीकडे आरक्षणावरूनच भारताचा शेजारी देश असणाऱ्या बांगलादेशमध्ये भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून बांगलादेशी तरुण गेल्या महिन्याभरापासून आक्रमक आंदोलन करत आहेत. नुकत्याच झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत जवळपास १०० जणांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये ग्रामीण बँकेचे संस्थापक नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत भारतावर संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशमध्ये नेमकं काय घडतंय?

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यावरून सगळा वाद सुरू झाला. महिन्याभरापूर्वी बांगलादेश सरकारने यासंदर्भात एक आदेशही पारित केला. त्यानुसार, ३० टक्के सरकारी नोकऱ्या या १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धातील वीरांच्या नातेवाईकांसाठी राखीव करण्यात आल्या. तेव्हा बांगलादेशमधील तरुणांनी रस्त्यावर उतरून या निर्णयाला व्यापक विरोध केला. त्यावेळी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण ५ टक्क्यांवर आणलं आणि त्यातील ३ टक्के स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या नातेवाईकांसाठी ठेवलं.

मात्र, यादरम्यान सरकारकडून करण्यात आलेल्या कारवायांमुळे संतप्त झालेली बांगलादेशी जनता रस्त्यावर उतरली आहे. यात प्रामुख्याने तरुणांचा समावेश आहे. तरुणांचा थेट सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, संबंधित संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलिसांशी संघर्ष होऊन त्यात हिंसाचार उफाळला आहे.

भारतावर टीकास्र!

दरम्यान, या सर्व प्रकरणामध्ये मोहम्मद युनूस यांनी भारतावर आगपाखड केली आहे. बांगलादेशमधील या सर्व घडामोडींबाबत भारत सरकारने हा त्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे, अशी भूमिका जाहीर केली. त्यावरून मोहम्मद युनूस यांनी संतप्त भूमिका मांडली आहे.

“SAARC च्या स्वप्नावर माझा विश्वास होता. सर्व सदस्य राष्ट्रांशी युरोपियन युनियनप्रमाणे एखाद्या कुटुंबासारखे संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे जेव्हा भारतानं सांगितलं की हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे, तेव्हा मला प्रचंड वेदना झाल्या. जर माझ्या भावाच्या घरात आग लागली असेल, तर मी तो त्याचा अंतर्गत मुद्दा आहे असं कसं म्हणू शकतो? राजनैतिक भाषेत ‘अंतर्गत मुद्दा’ यापेक्षाही अनेक योग्य शब्द आहेत”, असं युनूस या मुलाखतीत म्हणाले.

बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार ( फोटो – संग्रहित, द इंडियन एक्सप्रेस )

“शेजारी राष्ट्रांमध्येही धग पोहोचणार”

दरम्यान, युनूस यांनी यावेळी भारताला अप्रत्यक्ष शब्दांमध्ये इशारा दिला आहे. “जर बांगलादेशमध्ये काहीतरी घडतंय, १७ कोटी लोक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, तरुणांची सरकारी गोळ्यांनी हत्या होत आहे, कायदा-सुव्यवस्था अदृश्य झाली आहे तर हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही की हे लोण शेजारी राष्ट्रांमध्येही पसरेल”, असं युनूस म्हणाले.

Bangladesh Reservation Issue: बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार! सरकारकडून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू!

“हे तरुण त्यांच्या सुरक्षेसाठी शेजारी देशांत पलायन करतात. आपण आगीशी खेळत आहोत. हे देशातच सीमित राहणार नाही. जर परिस्थिती कायम राहिली, तर लोक सीमेपलीकडे जातील. शांततेच्या काळात स्थलांतरीतांना सहन केलं जाऊ शकतं. पण अशा तणावपूर्ण वातावरणात हे तरुण सीमेपलीकडे मोठं आव्हान निर्माण करू शकतात”, असंही मोहम्मद युनूस म्हणाले आहेत.

भारताकडून काय अपेक्षा?

दरम्यान, यावेळी युनूस यांनी भारतानं या स्थितीत काय करायला हवं, यावर भाष्य केलं. “भारतानं बांगलादेशमध्ये पारदर्शी निवडणुका होण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. शिवाय, तशा त्या झाल्या नाहीत, तर त्याचा निषेधही करायला हवा. भारतात नियमित अंतराने निवडणुका होतात. त्यांचं यश हे दाखवून देत आहे की आम्ही किती अपयशी आहोत. आम्हाला हे यश साध्य करण्यासाठी राजनैतिक मार्गांनी प्रोत्साहन न देणं हा भारताचा दोष आहे. हे पाहून आम्हाला वेदना होतात. आम्ही भारताला यासाठी माफ करणार नाही”, अशा शब्दांत मोहम्मद युनूस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh student protest nobel laureate muhammad yunus criticize india pmw
Show comments