Hathras Stampede Updates: उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीला भोलेबाबा जबाबदार आहेत. या भोलेबाबांचा शोध सुरु आहे. कारण चेंगराचेंगरीत १२१ लोक चेंगराचेंगरीत मारले गेल्यानंतर हे भोलेबाबा उर्फ सूरजपाल फरार आहेत. मात्र त्यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे अशी माहिती आता समोर आली आहे. मंगळवारी नेमकं काय घडलं? मंगळवारी स्थानिक धर्मोपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ भोले बाबा यांनी आयोजित केलेल्या सत्संगाच्या वेळी ही चेंगराचेंगरी झाली. “या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा हजारो लोक आले होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळच्या नाल्यात पडले,” या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. भोलेबाबा कोण, कुठले? नारायण सरकार विश्वास हरि उर्फ भोलेबाबा यांचं खरं नाव सूरजपाल सिंह आहे. कासगंज जिल्ह्यातल्या बहादूर नगर हे त्यांचं मूळ गाव आहे. दलित कुटुंबातून आलेले सूरजपाल सिंह यांचे दोन भाऊ होते. त्यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं आहे. तर त्यांचा लहान लहान भाऊ बहादूर नगर गावात राहतो आणि शोती करतो. हे पण वाचा- हाथरस चेंगराचेंगरीच्या आधी काय घडलं? “भोलेबाबा आसनावर बसले होते, महिला खांबावर चढल्या आणि…” डीजीपी प्रकाश सिंह यांनी काय म्हटलं आहे? हाथरसच्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश पूर्वचे डीजीपी प्रकाश सिंह यांनी सांगितलं सूरजपाल सिंह उर्फ भोलेबाबाला उत्तर प्रदेश पोलिसांनी नोकरीवरुन काढून टाकलं होतं. कारण सूरजपालविरोधात पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत. त्यात लैंगिक शोषणाचा गुन्हाही आहे. सूरजपाल सिंह यांचा सगळा इतिहास प्रकाश सिंह यांना ठाऊक आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. सूरजपाल सिंह यांनी १९९० च्या दशकात नोकरी सोडली असं सांगितलं जातं. मात्र त्यांना पोलिसांनी काढून टाकलं होतं असं प्रकाश सिंह यांनी म्हटलं आहे. बहादूर नगरचे रहिवासी जाफर अली काय म्हणाले? बहादूर नगरच्या सरपंच नाजिश खानम यांचे पती जाफर अली यांनी एका वृत्तपत्राला माहिती दिली आहे की सूरजपाल सिंह यांचं लग्न झालं आहे. मात्र त्यांना मूलबाळ झालेलं नाही. नोकरी सोडल्यानंतर तो सत्संग करु लागला. भोलेबाबा हे त्यांचं नाव पडलं. त्यांच्या पत्नीला लोक मातोश्री म्हणतात. जाफर यांनी हे देखील सांगितलं की सूरजपाल सिंह यांनी ३० एकर जमिनीवरही आपला आश्रम स्थापण्यात आला आहे. या आश्रमात अनेक लोक येत असतात. काही लोक या ठिकाणी वास्तव्यासही असतात. सूरजपाल सिंह उर्फ भोलेबाबांनी पाच वर्षांपूर्वी गाव सोडलं होतं. त्यांना तेव्हा वाटत होतं की त्याच्या विरोधात काहीतरी कट रचला जातो आहे. सूरजपाल सिंह सध्याच्या घडीला राजस्थानात राहतात. मागच्या वर्षी तो (भोलेबाबा) गावात आला होता. त्याने आपली संपत्ती ट्रस्टच्या नावे केली होती. या संपत्तीची देखरेख त्याचा एक मॅनेजर करतो.