गेल्या २४ तासांमध्ये बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार वर्षभराच्या आत पुन्हा एकदा भाजपाशी युती करण्याच्या तयारीत असल्याची तुफान चर्चा ऐकायला मिळत आहे. राजदशी काडीमोड घेऊन नितीश कुमार यांचा जदयू भाजपासोबत सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच, नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाची धुरा असेल, असंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे सत्ताबदलाची चर्चा असताना दुसरीकडे नितीश कुमार यांनी बिहारमधील तब्बल २२ आयएएस अधिकारी व ४५ इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या आधी या बदल्या करण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहारमध्ये नेमकं घडलंय काय?

बिहार सरकारनं अवघ्या चार दिवसांपूर्वी, अर्थात २३ जानेवारी रोजी २९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आता त्यात शुक्रवारी बदली करण्यात आलेल्या २२ आयएएस अधिकाऱ्यांची भर पडली आहे. हे सर्व अधिकारी जिल्हा न्यायदंडाधिकारी स्तरावरचे प्रशासक होते. त्याव्यतिरिक्त बिहार प्रशासकीय सेवेतील ४५ इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. इकोनॉमिक्स टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यातील सर्वात चर्चेत असणारी बदली म्हणजे वरीष्ठ IAS अधिकारी व पाटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांना थेट मुख्यमंत्री सचिवालयात विशेष सचिव पदावर बदली करण्यात आली आहे.

नितीश कुमारांनी घेतली आठवेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ; ‘सुसाशन बाबू’ ते ‘पलटू कुमार’ विरोधकांचे आरोप

गेल्या काही दिवसांपासून चंद्रशेखर सिंह यांचे बिहार शिक्षण विभागाशी रंगलेलं लेटरवॉर चांगलंच चर्चेत आलं होतं. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयावरून चंद्रशेखर सिंह यांचे बिहारच्या शिक्षण विभागाशी वाद झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, २३ तारखेचे आदेश व शुक्रवारचे आदेश पाहाता गेल्या चार दिवसांत बिहार सरकारने आत्तापर्यंत तब्बल ५१ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे.

नितीश कुमार राजदकडे पाठ फिरवणार?

नितीश कुमार हे सातत्याने बाजू बदलण्यासाठी कुप्रसिद्ध होऊ लागले आहेत. अगदी अलिकडे २०२० साली झालेल्या निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांनी भाजपासोबत प्रचार केला. पण जदयू तिसऱ्या स्थानी फेकला गेला. तरीही भाजपासोबत स्थापन केलेल्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. पण २०२२मध्ये त्यांनी भाजपाकडे पाठ फिरवून पुन्हा लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी आघाडी केली. पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. पण दोनच वर्षांच्या आत पुन्हा एकदा नितीश कुमार बाजू बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar cm nitish kumar government 22 ias officer transferred pmw