बिहारमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घडामोडींची देशभरात चर्चा पाहायला मिळाली. काहीही झालं तरी पुन्हा भाजपासोबत कदापि जाणार नाही, असं ठामपणे म्हणणारे नितीश कुमार राजदची साथ सोडून भाजपाच्या पंगतीत जाऊन बसले. या आघाडीत मुख्यमंत्री असणारे नितीश कुमार पुन्हा त्या आघाडीतही मुख्यमंत्री झाले आणि बिहारनं एका राजकीय भूकंपाचा अनुभव घेतला. यानंतर नितीश कुमार हे कोलांटउड्या घेण्यात तरबेज असल्याचं म्हणत त्यांना विरोधकांनी लक्ष्य केलं. पण नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यामुळे आपली शपथ पूर्ण झाली म्हणत बिहारमधील भाजपाचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी चक्क मुंडन करून शरयू नदीत आंघोळ केली आहे!

नितीश कुमार यांच्या जदयूची लालू यादव यांच्या राजदशी आघाडी असताना ते बिहारचे मुख्यमंत्री होते. तेव्हा विरोधी पक्षात असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे बिहारमधील प्रमुख नेते सम्राट चौधरी यांचा नितीश कुमार यांना तीव्र विरोध होता. तत्कालीन जदयू-राजद आघाडीवर सम्राट चौधरी परखडपणे टीका करताना पाहायला मिळत होते. याच संतप्त वातावरणात सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची शपथ घेतली होती.

काय होती सम्राट चौधरींची शपथ?

सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची शपथ घेतली होती. यासंदर्भात त्यांनी आज माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, ज्या नितीश कुमार यांच्यासोबत ते सध्या सरकारमध्ये आहेत, जे नितीश कुमार सध्या बिहारचे मु्ख्यमंत्री आहेत, त्याच नितीश कुमारांना भाजपा विरोधात असताना पदावरून हटवण्याची शपथ तेव्हा सम्राट चौधरी यांनी घेतली होती. त्यांची ती शपथ जानेवारी महिन्यात बिहारमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर पूर्ण झाली. पण त्यावेळी दिलेला शब्द सम्राट चौधरी यांनी त्याच नितीश कुमारांसोबत सत्तेत असताना पूर्ण केला आहे. त्यांनी त्यांची पगडी डोक्यावरून काढली आहे. हा व्हिडीओ त्यांनीच शेअर केला आहे.

आधी सडकून टीका, आता थेट नितीश कुमारांसह सत्तेत सहभागी? बिहाचे नवे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी कोण आहेत?

“नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवत नाही, तोपर्यंत डोक्यावरची पगडी काढणार नाही, अशी शपथ मी घेतली. त्यांना पायउतार करणं हा आमचा शब्द होता. त्यामुळे ही शपथ पूर्ण झाल्यानंतर मी माझी पगडी डोक्यावरून काढली आहे. २८ जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडून आमच्यासोबत सरकार स्थापन केलं, तेव्हा आमचा शब्द पूर्ण झाला”, अशी प्रतिक्रिया सम्राट चौधरी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.

अयोध्येत केली शरयू नदीत आंघोळ

सम्राट चौधरी यांनी आज अयोध्येत शरयू नदीमध्ये आंघोळ केली. यावेळी त्यांच्यासमवेत बिहार सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री व भाजपातील काही पदाधिकारी उपस्थित होते. शरयू नदीत आंघोळ करतानाच त्यांनी डोक्यावरची पगडी काढली. आंघोळीनंतर त्यांनी राम मंदिरात व हनुमान गढी येथे जाऊन दर्शन घेतलं.