काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेत संधी देण्यात आली आहे. राज्यसभेत निवडून गेल्यानंतर अशोक चव्हाणांचं हे पहिलंच पावसाळी अधिवेशन आहे. या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी अत्यंत संयमाने विरोधकांना काव्यातून प्रत्युत्तर दिलं आहे. ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत होते.

आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. यावेळी अनेक खासदारांनी सहभाग घेतला. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. सुरुवातीलाच ओळख करून देताना सभापती जगदीप धनखड यांनी अशोक चव्हाणांची ओळख करून दिली. ते लोकसभेचे सदस्य राहिले असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दोन वेळा आमदार राहिले असल्याचे त्यांनी संसदेला सांगितले आणि त्यांना स्मितहास्य करून बोलायला सुरुवात करण्यास विनंती केली. तसंच, माझी संक्षिप्त ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा मला अभिमान आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

हेही वाचा >> “..तर लाडांना चांगलाच ‘प्रसाद’ दिला असता”, अंबादास दानवे विधानपरिषदेतल्या राड्यानंतर पुन्हा आक्रमक

त्यानुसार, अशोक चव्हाणांनी अनेक मुद्द्यांवर त्यांचं मत मांडलं. संविधान बदलणार असल्याच्या खोट्या बातम्या पेरण्यापासून ते नीट परीक्षेतील गोंधळापर्यंत सर्व मुद्द्यांवर त्यांनी नेमकेपणाने भाष्य केलं. चर्चेच्या शेवटावर पोहोचल्यावर त्यांनी विरोधकांनाही चारोळीतून चिमटा काढला.

राज्यसभेत अशोक चव्हाणांची चारोळी

अशोक चव्हाण बरेच वर्षे काँग्रेसमध्ये होते. भाजपात गेल्यानंतर त्यांना तत्काळ राज्यसभेवर पाठवण्यात आलं. परंतु,अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वाखाली अनेक जागा भाजपाला गमवाव्या लागल्या असा दावा विरोधकांनी केला. त्यावर त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. अशोक चव्हाण म्हणाले, “आमचे काही सदस्य इथं बोलत होते की इथे पराभव झाला, तिथे पराभव झाला. काही सदस्यांनी म्हटलंय की नांदेडमध्येही पराभव झाला. काही लोकंना नांदेडमध्ये प्रचंड रुची आहे. जेव्हा महाराष्ट्रात कुठेच जागा मिळाली नव्हती तेव्हा काँग्रेसला नांदेड आणि हिंगोलीत जागा मिळाली होती. त्या यशात माझा छोटासा वाटा होता. मी जे काही काम केलंय ते प्रामाणिकपणे केलंय. तिथून जागा निवडून आणल्या आहेत. काही सदस्य असेही आहेत ज्यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीचेही सदस्य निवडून आले नाहीत. त्यामुळे मला आता इकचं म्हणायचं आहे की, जित पर कभी अहंकार नहीं किया, किसी हारपर कभी रोया नही
लेकिन हर हारके बात कभी चैनसे बैठा नही
!”

त्यांच्या या शेवटामुळे सभागृहातून टाळ्यांच्या कडकडाटाचा आवाज झाला.