हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या अभिनेत्री कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर एका अपमानजनक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. चंदीगढ विमानतळावर सीआयएसएफच्या महिला सुरक्षारक्षक कर्मचारी कुलविंदर कौर यांनी कंगना रणौत यांना श्रीमुखात मारल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर कंगना रणौत यांनीही यावर प्रतिक्रिया देत आपल्या कानशिलात लगावल्याचा आरोप केला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.

यानंतर सीआयएसएफच्या महिला सुरक्षारक्षक कर्मचारी कुलविंदर कौर यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. अभिनेत्री कंगना रणौत यांच्या श्रीमुखात मारल्याच्या आरोपाप्रकणी स्थानिक पोलीस ठाण्यात सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षक कुलविंदर कौर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी या महिला सुरक्षारक्षकाची चौकशी सुरू असून त्यांनी कंगना रणौत यांच्या श्रीमुखात का मारली? त्यामागील कारण काय? यासंदर्भातील चौकशी पोलिसांकाडून सुरू आहे.

हेही वाचा : चंदीगढ विमानतळावर महिला कर्मचाऱ्याने कानशिलात लगावल्यानंतर कंगना रणौत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आतंकवाद…”

कंगना रणौत यांनी काय प्रतिक्रिया दिली?

चंदीगढ विमानतळावर एका महिला सुरक्षारक्षकाने कानाखाली लगावल्याची घटना घडल्यानंतर एक व्हिडिओ प्रदर्शित करत कंगना रणौत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “मला अनेकांचे फोन येत आहेत. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान चंदीगढमध्ये ही घटना घडली. मी सुरक्षा तपासणीदरम्यान जात होते. त्यावेळी दुसऱ्या कॅबिनमध्ये सीआयएसएफची एक सुरक्षारक्षक महिला कर्मचारी होती. मी त्यांच्या पुढे निघून जाण्याची त्यांनी वाट पाहिली. मी पुढे निघून गेल्यानंतर माझ्या बाजूने येत त्यांनी माझ्यावर कानशिलात लगावली. मी त्यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात”, असं त्या म्हणाल्या. “तसंच आंतकवाद आणि उग्रवाद पंजाबमध्ये वाढत असून तो कसा रोखायचा?”, असा सवालही त्यांनी केला.

सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाणार

चंदीगढ विमानतळावर एका महिला सुरक्षारक्षकाने कंगना रणौत यांच्या कानाखाली लगावल्या घटनेनंतर खळबळ उडाली. या प्रकरणी त्या महिला सुरक्षारक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. तसंच पोलिसांनी सीआयएसएफच्या महिला सुरक्षारक्षक कुलविंदर कौर यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी नेमकं काय झालं? यासंदर्भातील चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही तापसले जाणार आहेत, अशी माहिती सांगण्यात येत आहे.

मंडीमधून कंगना विजयी

मंडी या मतदारसंघातून कंगना रणौत लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. अत्यंत अटीतटीच्या लढतीतून त्या जिंकल्या आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनतेचे आभार मानून मंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी काम करणार असल्याचं सांगितलं.