१३ फेब्रुवारीला अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. तर त्याआधी जुलै २०२३ मध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीच्या गटासह सरकारमध्ये आले. तर दुसरीकडे जून २०२२ या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारलं आणि त्यांनीही भाजपाशी हातमिळवणी केली. आता सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. ही महायुती म्हणजे भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या युतीचं सरकार आहे. अशात भाजपाने फोडाफोडी केली तरीही भाजपाला २०० जागा मिळणार नाहीत असा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबेंनी काय म्हटलं आहे? "भाजपात अमित शाह, नरेंद्र मोदी किंवा जे.पी. नड्डा कुणीही असो ते घराणेशाहीच्या गोष्टी करतात. पण ते विरोधी पक्षातल्या घराणेशाहीबद्दल बोलतात. त्यांना त्यांचा भाजपा पक्ष दिसत नाही. तसंच लोजपा दिसत नाही. अनुराग ठाकूर यांची घराणेशाही, धर्मेंद्र प्रधान यांची घराणेशाही दिसत नाही. इंडिया आघाडीची एवढी भीती का वाटते आहे? घराणेशाही आणि इंडिया आघाडी यांच्यावर टीका करण्याचं काम होतं आहे. इतकंच नाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांची फोडाफोडी करायची. त्यानंतर त्या लोकांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि ४०० पार, २०० पारचे नारे द्यायचे. हा फक्त तुम्ही भ्रम पसरवत आहात दुसरं काहीही नाही. या सगळ्यामुळे स्पष्ट झालंय की तुम्हाला २०० जागाही मिळणार नाहीत. " असं दुबे यांनी म्हटलं आहे. हे पण वाचा- “नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील आणि घराणेशाही मूळापासून संपवतील”, अमित शाह यांचा दावा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात घराणेशाहीवर टीका केली. त्याचप्रमाणे अमित शाह यांनीही असं म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा तिसऱ्या टर्ममध्ये देशाचे पंतप्रधान होतील तेव्हा ते घराणेशाही, दहशतवाद यांचा समूळ खात्मा करतील. यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांचं वक्तव्य समोर आलं आहे. भाजपा घाबरली आहे त्यामुळे ते असे दावे करत आहेत. त्यांना २०० जागाही जिंकता येणार नाहीत असं दुबे यांनी म्हटलं आहे.