राजधानी दिल्लीत भरलेल्या जी २० परिषदेमध्ये जगभरातल्या अनेक प्रभावी राष्ट्रांच्या प्रमुखांची उपस्थिती होती. त्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ यांचाही समावेश होता. जस्टिन ट्रुडेओ तर परिषदेनंतरही त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एक दिवस भारतातच मुक्कामी होते. मात्र, जी २० परिषदेनंतर अवघ्या १० दिवसांच्या आत कॅनडातील खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडानं भारताच्या उच्चाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. भारताचा या हत्येशी संबंध असल्याचा थेट आरोपच जस्टिन ट्रुडेओ यांनी कॅनडाच्या संसदेत केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

जून महिन्यात कॅनडाच्या सरे शहरात हरदीप सिंग निज्जर याची हत्या करण्यात आली होती. एका गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये दोन तरुणांनी निज्जरवर गोळ्या झाडल्या होत्या. यात त्याचा मृत्यू झाला होता. हरदीप सिंग निज्जर हा कट्टर खलिस्तानी समर्थक असल्याची बाब समोर आली असून त्यावरून भारत व कॅनडा सरकार आमने-सामने आल्याचं दिसून येत आहे. कॅनडा सरकारकडून या हत्येशी भारताचा संबंध असल्याचा दावा केला आहे. तसेच, भारताच्या कॅनडातील उच्चायुक्तांची हकालपट्टी केली आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांचं संसदेत निवेदन!

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ हे जी २० परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसून आले होते. तसेच, भारताच्या व्यवस्थापनावर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रियाही दिली होती. त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांनी दिल्लीतील आपला मुक्काम एक दिवस वाढवलाही होती. मात्र, मायदेशी परतल्यानंतर अवघ्या १० दिवसांच्या आत जस्टिन ट्रुडेओ यांनी देशाच्या संसदेसमोर केलेल्या निवेदनात भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

“कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येशी भारत सरकारच्या उच्चाधिकाऱ्यांचा काही संबंध आहे का? यासंदर्भात गेल्या काही आठवड्यांपासून कॅनेडियन तपास यंत्रणा सखोल तपास करत होत्या”, असं जस्टिन ट्रुडेओ कॅनडाच्या संसदेत म्हणाले. अर्थात, जी २० परिषदेच्याही आधीपासून या दिशेनं कॅनडाच्या तपास यंत्रणा तपास करत होत्या हे यावरून स्पष्ट होत आहे.

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली माहिती

दरम्यान, पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ यांनी प्रकरणासंदर्भात थोडक्यात निवेदन केल्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मलेनी जॉली यांनी या कारवाईची माहिती दिली. “कोणत्याही प्रकारचा विदेशी हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही यावर आम्ही ठाम आहोत. हे प्रकरण समोर आल्यापासून आम्ही तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं. पहिला, आम्ही सत्य शोधू. दुसरा, आम्ही कॅनेडियन नागरिकांचं संरक्षण करू आणि तिसरा, आम्ही कॅनडाचं सार्वभौमत्व जपू. यासंदर्भात आम्ही भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी भारताकडून पूर्ण सहकाऱ्याची आम्हाला अपेक्षा असल्याचंही आम्ही त्यांना कळवलं आहे. परिणामी आम्ही कॅनडामधून एका वरिष्ठ भारतीय उच्चाधिकाऱ्याला निलंबित केलं आहे”, असं त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canada expels india diplomat over khalistani supporter hardeep singh nijjar murder case pmw