सातारा मतदारसंघात २३ मे रोजी मतदान झाल्यानंतर पुन्हा २९ तारखेला नवी मुंबईत मतदान करण्याचा अजब सल्ला भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे. मतदारांना दोन वेळा मतदान करण्याचा सल्ला दिल्याने मंदा म्हात्रे मात अडचणीत सापडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. दरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवेसनेचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी कोपरखैरणे येथे मेळाव्याचे आयोजन कऱण्यात आले होते. या परिसरात सातारा आणि शिरुर मतदारसंघातील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. ते पाहता युतीच्या या मतदारसंघातील उमेदवारांसाठीही हा मेळावा होता. मंदा म्हात्रे यांना आपली चूक लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील असाच सल्ला यापूर्वी दिला होता असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मेळाव्यात सातारामधील युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता देशात लोकशाही नांदते, मात्र सातारामध्ये राजेशाही नांदत असल्याची टीका केला.