लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी आज एनडीएच्या संसदीय दलाची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सर्व एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली आहे. यावेळी अमित शाह, नितीन गडकरी, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्या आदी नेत्यांनी संसदीय दलाचे नेते म्हणून पाठिंबा दिला. यावेळी चंद्रबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.

इंडिया आघाडीने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यासाठी संपर्क साधल्याची चर्चा आहेत. पण चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एनडीएबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आज एनडीएच्या संसदीय दलाची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. यावेळी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे आता इंडिया आघाडीच्या सत्ता स्थापेनेच्या आणि चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे इंडिया आघाडीकडे येतील, या आकांक्षांवर पाणी फेरलं आहे.

चंद्रबाबू नायडू काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आंध्र प्रदेश विधानसभेची निवडणूक जिंकण्यास मदत झाली. नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, अमित शाह, नितीन गडकरी यांच्या सभांमुळे मतदारांमध्ये मोठा निश्वास निर्माण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांचा भारताचे पंतप्रधान होत आहेत. हे देशासाठी अभिमानाची बाब आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश अव्वल स्थानी जाईल. एन टी आर यांचं व्हिजन नरेंद्र मोदी प्रत्यक्षात उतरवत आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासारखा उत्तम नेता भारताकडे आहे. त्यांच्याकडे देशासाठी व्हिजन आहे”, असं चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.

चंद्रबाबू नायडू हे मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षातील कामगिरीची माहिती देताना म्हणाले, “देश लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. गेल्या १० वर्षांत भारतात मोठा बदल झाला आहे. आता भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था नक्कीच बनेल. अर्थव्यवस्थेचा वेग थांबणार नाही. भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. मात्र, हा वेग असाच सुरू राहील आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल”, असंही चंद्राबाबू नायडू म्हणाले.

जे.पी.नड्डा काय म्हणाले?

“एनडीएतल्या वरिष्ठ नेत्यांचं, मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करतो. तसंच सगळ्या खासदारांचंही मी अभिनंदन करतो. आजचा क्षण हा ऐतिहासिक आहे. आपण या क्षणाची वाट पाहात होतो, तोच क्षण आहे. तिसऱ्यांदा देशात एनडीएचं सरकार येतं आहे. आपले नेते म्हणून आपण एकमुखाने पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची निवड केली आहे.

नितीश कुमार काय म्हणाले?

“आम्ही नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. ते गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान आहेत. तसेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. याचा मला आणि आमच्या पक्षाला आनंद आहे. मोदींनी गेल्या १० वर्षात देशातील जनतेची सेवा केली आहे. पुढे पाच वर्षही ते देशातील जनतेची सेवा करतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आम्ही पुढची पाच वर्षे मोदींबरोबर राहून त्यांना साथ देऊ आणि मोदी सांगतील ते मान्य करून पुढे जाऊ”, असं नितीश कुमार यांनी म्हटलं.