केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग राजनची चौकशी करणार
किमान सत्तर गुन्हय़ांत हवा असलेला कुख्यात गुंड छोटा राजन याला अखेर सत्तावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अटक करून भारतात आणण्यात यश आले आहे. राजन याला इंडोनेशियातून आज सकाळी विमानाने दिल्लीत आणण्यात आले. आज त्याला भारतीय हवाई दलाच्या गल्फस्ट्रीम-३ या खास विमानाने त्याला बाली येथून दिल्लीला आणण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता त्याला पालम विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर तेथे छायाचित्रकार व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची गर्दी उसळली होती, पण राजन कुठल्या गाडीत आहे हे समजू दिले गेले नाही. सीबीआयच्या पथकातील अधिकाऱ्यांनी त्याला भारताच्या ताब्यात घेण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली.
दिल्ली व मुंबई येथे त्याच्यावर खंडणी, अमली पदार्थ तस्करी, खून असे अनेक गुन्हे दाखल आहेत. राजनची चौकशी सीबीआय म्हणजे केंद्रीय गुन्हे अन्वेषण खात्याकडे देण्यात आली आहे. राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असून, दिल्लीतील पालम विमानतळावर उतरल्यानंतर त्याला थेट सीबीआयच्या मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्यांचे जाबजबाब घेण्यात आले. माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याला वेगळय़ाच मोटारीतून नेण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव राजन याला दिल्ली न्यायालयात नेले जाणार नाही तर दंडाधिकाऱ्यांना सीबीआयच्या मुख्यालयात बोलावून त्याला कोठडी दिली जाईल. त्याची सक्तीने वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्याला दिल्लीतच ठेवले जाणार असून, विविध चौकशी संस्थांचे अधिकारी येथे येऊन त्याचे जाबजबाब घेतील. दाऊद विरोधात आणखी पुरावे मिळवण्यासाठी त्याच्या जाबजबाबांचा वापर होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मुंबई पोलिसांवर भाजप सरकारचा विश्वास नाही’
छोटा राजनचे गुन्हे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवून केंद्र व राज्यातील भाजप सरकारने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केल्याची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे. छोटा राजनच्या विरोधात ७०पेक्षा जास्त गुन्हे मुंबईत दाखल आहेत. मुंबईतील टोळीयुद्ध मोडून काढण्यात मुंबई पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजाविली आहे. अशा वेळी राजनचा ताबा मुंबई पोलिसांना मिळणे आवश्यक होते; पण सीबीआयकडे सारे गुन्हे हस्तांतरित करून राज्य सरकारने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविल्याची टीका काँग्रेसचे संजय निरुपम आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी केली.

राजन तंदुरूस्त
सीबीआयच्या प्रवक्तयाने निवेदनात म्हटले आहे की, राजनला इंडोनेशियातून यशस्वीरित्या भारतात आणण्यात आले आहे, तो सध्या सीबीआय-इंटरपोलच्या ताब्यात आहे. कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले जात आहेत.
* राजन वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरूस्त असून त्याला डायलिसिसची गरज नाही. महाराष्ट्र सरकारने मात्र आर्थर रोड तुरूंगात राजनला ठेवल्यास त्याच्यासाठी डायलिसिसची व्यवस्था करण्याचे ठरवले.
* राजनची मूत्रपिंडे व्यवस्थित काम करीत नसल्याने त्याच्या प्रकृतीस धोका असल्याचे आधीचे वृत्त होते त्यामुळे ही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राजन हा आधी दाऊदचा साथीदार होता, पण १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्यांच्यात फाटाफूट झाली. नंतर २००० मध्ये दाऊदने राजनला बँकॉक येथे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. राजन हा १९८८ मध्ये भारतातून दुबईला पळाला होता.