CJI D Y Chandrachud : सध्याच्या घडीला दिल्ली आणि एनसीआर येथील प्रदूषण हा देशात चर्चेचा विषय ठरला आहे. उत्तर भारतातलं वातावरण बिघडलं आहे. हवेतील प्रदूषण वाढलं आहे. आता भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड ( CJI D Y Chandrachud ) यांनी प्रदूषणाचा वाढता स्तर हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण वाढत्या प्रदूषणामुळे मॉर्निंग वॉक बंद केला आहे असं चंद्रचूड ( CJI D Y Chandrachud ) यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले डी. वाय. चंद्रचूड?

पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधत असताना चंद्रचूड म्हणाले, ” मी डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेलो होतो. मला डॉक्टरांनी हवा प्रदूषित असल्याने मॉर्निंग वॉकला न जाण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी जर वॉक घेण्यासाठी तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला श्वास घेण्याच्या तक्रारी उद्भवतील. त्याऐवजी तुम्ही घरातच थांबा, तेच तुमच्यासाठी चांगलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं.” असं चंद्रचूड ( CJI D Y Chandrachud ) यांनी म्हटलं आहे.

मी आजपासूनच मॉर्निंग वॉक बंद केला

पत्रकारांना चंद्रचूड म्हणाले, “डॉक्टरांनी मला सल्ला दिल्यानंतर मी आजपासूनच मॉर्निंग वॉक बंद केला. मॉर्निंग वॉकसाठी मी आता सकाळच्या वेळी बाहेर पडत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेण्यापूर्वी मी पहाटे ४ ते ४.१५ च्या दरम्यान मॉर्निंग वॉकला जात असे.” असंही चंद्रचूड ( CJI D Y Chandrachud ) म्हणाले.

हे पण वाचा- लोकसत्ता लेक्चर’ : नवा उपक्रम: न्या. चंद्रचूड यांच्या व्याख्यानाने ‘विचारोत्सवा’ची नांदी’

पत्रकारांसाठी खास सुविधा

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की सर्वोच्च न्यायालयातील बातम्या करण्यासाठी जे पत्रकार येतात त्यांच्याकडे कायदा या विषयात शिक्षण घेतल्याची पदवी असलीच पाहिजे ही बाब अनिवार्य असणार नाही. तसंच पत्रकारांना लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात वाहन पार्क करण्यासाठीही जागा उपलब्ध करुन देऊ. न्यायालयीन प्रक्रियेचं डिजिटलायझेशन होतं आहे ही चांगली बाब आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे इतर भाषांमध्ये भाषांतरित करण्यासाठी AI या तंत्रज्ञानाचा विचार केला जाईल असंही चंद्रचूड म्हणाले. डिजिटलायझेशन झाल्याने अनेक न्यायाधीशांना विमान प्रवासादरम्यान आयपॅडचा वापर करुन अनेक निर्णय वाचता येतात असंही त्यांनी सांगितलं. तसंच आपण लवकरच निवृत्त होणार आहोत आणि त्यानंतर काही काळ आराम करणार आहोत असंही चंद्रचूड ( CJI D Y Chandrachud ) यांनी स्पष्ट केलं.

दिल्लीत वायू प्रदूषण वाढल्याने श्वास विकार जडलेले रुग्ण वाढले

दिल्लीत वायू प्रदूषण वाढल्याने रुग्णालयात श्वास विकार जडलेल्या रुग्णांची संख्या ३० ते ४० टक्के वाढली आहे. श्वास विकार तज्ज्ञांनी सांगितलं की अनेक वयोवृद्ध लोकांना हवा प्रदूषणामुळे त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे ते बाहेर न पडणं पसंत करतात. बाहेर पडल्यानंतर धुळीशी संपर्क आला की त्यांना श्वासासंबंधीचे विकार जडत आहेत. दिल्लीचा AQI मागच्या आठवड्यापासून फारच वाईट आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्याच अनुषंगाने आज डी. वाय. चंद्रचूड यांनी जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी या वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली.