अशोक चव्हाणांनी प्रचारासाठी नेताही भाडोत्री आणला, भाडोत्री नेता आणून अशोक चव्हाण समर्थन मागत आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे यांची नांदेडमध्ये सभा पार पडली त्या सभेत मुख्यमंत्री आणि मोदींवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा डाव आखला आहे असाही आरोप केला. राज ठाकरेंच्या टीकेला आज फडणवीस यांनी उत्तर दिलं. नांदेडच्या भोकरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सभेत ही टीका करण्यात आली.

महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याचा आरोप राज ठाकरे माझ्यावर करत आहेत. मात्र यासंदर्भातला करार अशोक चव्हाणांनी केला होता आणि मी तो रद्द केला असं म्हणत या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. अशोकराव तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तु्म्ही नांदेडला किती पैसे दिलेत सांगा? आम्ही २ हजार २२६ कोटी थेट शेतकऱ्यांना दिले हे तुम्ही कसं विसरता? असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे हे आम्ही जाणतो त्याचमुळे मोदींनी एक घोषणा केली आहे की शेतकरी साठ वर्षांचा झाला की त्यालाही पेन्शन देण्यात येईल. जगात शेतकऱ्यांना पेन्शन देणारं भारत हे पहिलं राष्ट्र ठरलं आहे. गरीबी हटावचा नारा राहुल गांधी देत आहेत. इतक्या वर्षांनी ही घोषणा देताना लाज कशी वाटत नाही? असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीवरही निशाणा साधला आहे.

नांदेडमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राशी काहीही देणंघेणं नाही ते महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवायला निघाले आहेत असं म्हणत टीका केली होती. त्या टीकेलाही आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. तसंच राज ठाकरेंचा उल्लेख भाडोत्री नेता असा केला आहे. अशोक चव्हाणांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना प्रचारासाठीही भाडोत्री नेता आणावा लागला, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज अशोक चव्हाणांवर टीका केली आहे आणि राज ठाकरेंनाही टोला लगावला आहे.