लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचा दावा केला. आता, बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा रंगली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीश कुमार पुन्हा भाजपा प्रणित ‘एनडीए’ आघाडीबरोबर जाण्याची शक्यता आहे. याला भाजपाकडून मंजुरीही मिळाली असून बिहारची विधानसभा बरखास्त केली जाऊ शकते. भाजपानं आपल्या सर्व आमदारांना पाटण्यात बोलावून घेतलं आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘एनडीटीव्ही’ला दिली.

नितीश कुमारांना थांबवण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव सक्रिय झाले आहेत. लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. तर, काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा : ‘सुभेदारां’च्या भयगंडामुळे ‘इंडिया’च्या जागावाटपात अडथळा

नितीश कुमार यांनी बुधवारी घराणेशाहीवरून लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं होतं. त्यानंतर बिहारचं राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल ( आरजेडी ) आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड ( जेडीयू ) मध्ये तणाव वाढला आहे. त्याचा परिणाम २५ जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आला. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली मंत्रिमंडळ बैठक लवकर संपली. तसेच, पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली.

नितीश कुमार काय म्हणाले होते?

घराणेशाहीबाबत बोलताना नितीश कुमारांनी म्हटलं, “आजकाल लोक आपल्या कुटुंबाला पुढं आणतात. पण, समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांनी कुटुंबाला कधी पुढं आणलं नाही. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत आम्ही कुटुंबाला राजकारणात आणलं नाही. कर्पुरी यांच्यानंतर आम्ही त्यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांना राजकारणात आणलं.”

यानंतर लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणीनं ‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट करत नितीश कुमारांना प्रत्युत्तर दिलं होतं. “जे समाजवादी नेता असल्याचा दावा करतात, तेच वाऱ्यासारखं आपली विचारसारणी बदलत असतात,” असं रोहिणीनं म्हटलं होतं. वाद निर्माण झाल्यावर रोहिणीनं सर्व ट्वीट डिलीट केले होते.

हेही वाचा : इंडिया आघाडीच्या ऐक्याला तडा

बिहारमध्ये कुणाचे किती आमदार?

बिहारमधील महागठबंधन सरकारमध्ये आरजेडी, जेडीयू, काँग्रेस, सीपीआय (एमएल), सीपीएम, सीएमआय सामील आहेत. २४३ जागा असलेल्या बिहार विधानसभेत आरजडीचे ७९, भाजपाचे ७७, जेडीयूचे ४५, काँग्रेसचे १९, कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एमएल) के १२, एमआयएम १, हिंदुस्तानी अवाम मोर्चा चे ४, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) के २, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया के २ आमदार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm nitish kumar go with bjp again bjp leadership has approved nitish kumar sources ssa