Yogi Adityanath on Sangam Water: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुभं दरम्यान त्रिवेणी संगमावरील पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. विधानसभेत बोलत असताना योगी आदित्यनाथ म्हणाले, संगमावरील पाणी फक्त आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य आहे. पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित केलेले प्रश्न हे महाकुंभला बदनाम करण्यासाठी उपस्थित केले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

काल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संगमावरील पाण्याच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक अहवाल दिला होता. संगमावरील पाण्यात फेकल कॉलीफॉर्मचा स्तर खूपच वाढला असल्याचे अहवालात म्हटले होते.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, यूपी प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याची गुणवत्ता कायम राहावी, यासाठी अथक प्रयत्न करत आहे. आजच्या ताज्या चाचणीनुसार संगमावरील पाण्यात बीओडीची मात्रा ३ पेक्षा कमी आहे. तसेच त्यात डिझॉल्व्ह ऑक्सिजनची पातळी ८-९ च्या आसपास आहे. याचा अर्थ संगमावरील पाणी केवळ आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य आहे. पाण्यात फेकल कॉलीफॉर्म वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. सीवेज लिकेज आणि जनावरांच्या मल-मूत्रामुळे याची मात्रा वाढू शकते. पण संगमावरील पाण्यात फेकल कॉलीफॉर्मची पातळी कमी आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल काय सांगतो?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा ताजा अहवाल आता राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) सुपूर्द करण्यात आला आहे. संगमावरील पाण्यात फेकल कॉलीफॉर्मचा स्तर खूपच वाढला आहे. मंडळाच्या संशोधन पथकाने प्रयागराज येथील अनेक घाटावरून पाण्याचे नमुने गोळा केले. हे नमुने तपासल्यानंतर त्यामध्ये प्रदुषणकारी घटकांची संख्या अधिक असल्याचे आढळले. गंगा नदीच्या १०० एमएल पाण्यात कॉलीफॉर्मची पातळी ७ लाख एमपीएनवर तर युमना नदीतील कॉलीफॉमची पातळी ३,३०,०० एमपीएन / १०० एमल वर पोहोचली असल्याचे म्हटले होते.

विधानसभेत बोलत असताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, महाकुंभ हा कोणत्या एका पक्षाचा किंवा सरकारचा कार्यक्रम नाही. हा समाजाचा कार्यक्रम आहे. आम्ही फक्त तो पार पाडत आहोत. आता फक्त सात दिवस उरले आहेत. आतापर्यंत ५६ कोटी २६ लाख लोकांनी त्रिवेणी संगमावर आंघोळ केली आहे. आम्हाला महाकुंभाची व्यवस्था करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य समजतो.

Story img Loader