कोळसा खाण वाटप घोटाळाप्रकरणी ज्या कंपन्यांची चौकशी होणार आहे त्याची महिती अगोदरच फुटण्याच्या प्रकाराची सीबीआयने गंभीर दखल घेतली असून लवकरच त्याबाबतची चौकशी सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.लखनौतील आयपीएस अधिकारी आणि अमिताभ ठाकूर या कार्यकर्त्यांने याबाबत केंद्रीय दक्षता आयोगाकडे (सीव्हीसी) तक्रार केली आहे. या तक्रारीची सीबीआयने दखल घेतली असून लवकरच त्याची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आणि शोधमोहीम हाती घेण्यात आल्यानंतर तीन दिवसांनी ठाकूर यांनी सीव्हीसीकडे तक्रार केली असून त्यांनी ती सीबीआयकडे हस्तांतरित केली आहे.
तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पाच महिन्यांनी ठाकूर यांच्याकडे उपलब्ध असलेल्या दस्तऐवजाची मागणी केली आहे. तातडीची आवश्यक कारवाई करण्यासाठी आणि ठाकूर यांनी केलेल्या आरोपांच्या पुष्टय़र्थ ही मागणी करण्यात आली आहे.
ज्या कंपन्यांवर छापे टाकण्यात येणार आहेत त्या कंपन्यांना त्याची पूर्वकल्पना देण्यात देण्यात आली, त्यामुळे त्यांना पुरावे नष्ट करता आले, असा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर अमिताभ ठाकूर यांनी सीव्हीसीकडे तक्रार केली होती.

Story img Loader