अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास त्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोक वीर दासवर देशाचा अपमान केल्याचा आरोप करत आहेत. वीर दास सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे तसेच सोशल मीडियावर अनेकांनी त्याने भारताचा अपमान केल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण पुढे वाढत असल्याचे पाहून कॉमेडियन वीर दासने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देत भारताला महान देश म्हटले आहे.
अलीकडेच वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला आहे. वॉशिंग्टन डीसी मधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये त्याच्या अलीकडील सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, दासने देशाच्या कथित दुहेरी चारित्र्याबद्दल भाष्य केल्याचे आणि कोविड-१९ महामारी, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवरील कारवाई ते शेतकरी निषेध या मुद्द्यांचा उल्लेख केला. त्याची बोलण्याची शैली लोकांना आवडली असली तरी आता त्याला विरोध केला जात आहे.
वीर दासच्या या संपूर्ण व्हिडिओची एक छोटी क्लिप ट्विटरवर शेअर करून लोकांनी त्याला चांगलेच सुनावले आहे. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. “मी अशा भारतातून आलो आहे जिथे हवा गुणवत्ता निर्देशांक ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे मोजतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आमचा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकर्यांवर धावून जातो,” असे व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये म्हटले आहे.
वीर दासच्या या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर लोक त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत. लोक त्याला अपमानास्पद शब्दांनी ट्रोल करत आहेत आणि त्याला ‘देशद्रोही’ म्हणत आहेत. व्हिडिओ क्लिप शेअर करताना भाजपा कार्यकर्त्या प्रीती गांधी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे, त्याचवेळी त्यांनी हा व्हिडिओ घृणास्पद आणि मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे.
वीर दासचे स्पष्टीकरण
सोशल मीडियावरील या व्हिडिओवर लोकांचा संताप पाहून वीर दासने यावर स्पष्टीकरण दिले असून आपला उद्देश देशाचा अपमान करण्याचा नव्हता, तर सर्व प्रकरणांनंतरही देश ‘महान’ असल्याची आठवण करून देण्याचा हेतू आहे असे म्हटले. एकाच विषयावर दोन भिन्न विचार असलेल्या लोकांबद्दल व्हिडिओमध्ये बोलले जात आहे आणि हे काही रहस्य नाही जे लोकांना माहित नाही. हा व्हिडिओ आम्हाला आवाहन करतो की आम्ही महान आहोत हे कधीही विसरू नका. आपल्याला काय महान बनवते यावर लक्ष केंद्रित करणे कधीही थांबवू नका,” असे वीर दासने म्हटले आहे.
“आपल्या सगळ्यांना ज्या देशावर प्रेम आहे, ज्यावर विश्वास आहे आणि त्याचा अभिमान आहे अशा देशासाठी मोठ्या देशभक्तीपर टाळ्यांचा कडकडाट झाला आहे. आपल्या देशामध्ये मथळ्यांपेक्षाही बरेच काही आहे, हाच व्हिडिओचा मुद्दा आहे,” असे स्पष्टीकरण वीर दासने दिले आहे. माझ्यासाठी, जगाच्या पाठीवर कुठेही माणसांनी भरलेली खोली, भारताचा जयजयकार करणे म्हणजे प्रेम आहे, असेही वीर दासने म्हटले आहे.