नवी दिल्ली : संसदेच्या कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांच्या अपरिपक्वतेमुळे गुरुवारी लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला. सभागृहातील गदारोळ नियंत्रणात आणण्यासाठी थेट केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हस्तक्षेप करावा लागला. अर्थसंकल्पावर शांततेत सुरू असलेल्या चर्चेमध्ये अचानक निर्माण झालेल्या व्यत्ययामुळे सभागृह तब्बल ४० मिनिटे तहकूब करण्याची वेळ पीठासीन अधिकाऱ्यांवर आली.

लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे अर्थसंकल्पावर बोलणार होते. त्याआधी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू त्यांच्या समोरील पहिल्या रांगेत येऊन बसले होते. तटकरे यांच्याशी रिजिजू बोलत असतानाच पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी तटकरेंचे नाव उच्चारले. तेवढ्यात तृणमूल काँग्रेसचे आक्रमक खासदार कल्याण बॅनर्जी यांनी रिजिजू यांच्या आसनग्रहणावर आक्षेप घेतला. विरोधी पक्षांच्या आसनांवर रिजिजू बसले असून त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आसनांवर बसले पाहिजे, असे म्हणत बॅनर्जी यांनी प्रचंड आरडा- ओरडा केला. पीठासीन अधिकारी पाल यांचा बॅनर्जी यांना शांत करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.

हेही वाचा >>>मंत्री विजयकुमार गावित यांच्या विरोधात सारेच एकवटले

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सत्ताधारी बाकांवरच बसले पाहिजे, नाहीतर मी सत्ताधारी बाकांवर बसेन, असे म्हणत खासदार कल्याण बॅनर्जी विरोधी पक्षांच्या बाजूकडून थेट सत्ताधारी बाकांवर गेले आणि त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पहिल्या रांगेतील आसनावर बसण्याचा प्रयत्न केला. बॅनर्जी यांचा संतप्त अवतार बघून संरक्षणमंत्री सावध झाले. त्यांनी तातडीने बॅनर्जी यांना दोन्ही हाताने पकडले आणि सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर न बसण्याची सूचना केली.

राजनाथ यांनी स्वत: हस्तक्षेप केल्याने पीयूष गोयल वगैरे इतर मंत्री व भाजपचे खासदारही बॅनर्जी यांच्या भोवती गोळा झाले. त्यानंतर गोंधळ वाढल्याने पाल यांनी सभागृह तहकूब केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सदस्य कुठल्याही आसनांवर बसू शकतात’

बॅनर्जी यांचा गोंधळ सुरू असताना केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री लोकसभाध्यक्षांच्या समोरील बाकांवर बसून होते. वास्तविक, लोकसभेमध्ये सदस्यांसाठी आसन क्रमांक निश्चित झालेले नाहीत. बसण्याच्या जागा ठरलेल्या नसल्याने दोन्ही बाजूंकडील सदस्य कुठल्याही आसनांवर बसू शकतात. त्यामुळे रिजिजू कुठेही बसले तरी चुकीचे ठरत नाही, असे पाल यांनी स्पष्ट केले.